Ind Vs Aus Test Series : पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, संघाच्या कामगिरीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष
एमपीसी न्यूज – भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला 17 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. अॅडलेडच्या मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व विराट कोहली तर उर्वरित सामन्याचे नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करणार आहे. T20 मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर कसोटीत भारतीय संघाच्या कामगीरीकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. हनुमा विहारीच्या रुपानं एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे. बुमराह, शामी आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. तर अनुभवी अश्विनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व करून कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थिती भारतीय संघाचं नेतृत्व मराठमोळा अजिंक्य रहाणे करणार आहे. अजिंक्य रहाणेने याआधीही भारतीय संघाचं यशस्वी नेतृत्व केलं आहे. या दौऱ्यातही रहाणे स्वत:ला सिद्ध करेल. रहाणे एक चांगला फलंदाज आणि कर्णधार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी रहाणे घेईल असा मला पूर्ण विश्वास आहे. असे व्यक्तव्य विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केले आहे.
'Ajinkya and I are on the same page and I’m sure he'll do a tremendous job in my absence,' says #TeamIndia Skipper @imVkohli on the eve of the first Test against Australia.#AUSvIND pic.twitter.com/S8fmUABfUC
— BCCI (@BCCI) December 16, 2020
एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी तर, भारताने T20 मालिका 2-1 अशी जिंकल्यानंतर दोन्हीही संघ एकमेकांना मोठी टक्कर देणार हे निश्चित. भारतीय संघातील युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ :
मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमराह