Ind Vs Eng Test : भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा कसोटी सामना रद्द

एमपीसी न्यूज – भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आजपासून (दि.10) सुरू होणार होता. पण, भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबत अधिकृत माहिती दिली असून, त्यांनी याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे.

चौथ्या कसोटीदरम्यान भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला होता. भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांच्यासह, क्षेत्ररक्षण कोच, गोलंदाज कोच आणि एका मेडिकल टीममधील सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सर्व खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली होती. आज देखील पाचव्या कसोटीतील सर्व खेळाडूंची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली होती. सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण, अखेर कसोटी सामना रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

‘भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने, भारतीय संघाकडे खेळाडूंची कमतरता असल्याने सामना रद्द करावा लागत आहे,’ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय संघातील काही खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. 19 सप्टेंबरपासून सुरू होणा-या IPL च्या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग आणि इतर कारणांमुळे खेळाडू नकार देत असल्याची माहिती समोर आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.