Ind Vs Eng Test Series : अश्विनचे पाचवे कसोटी शतक, इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे आव्हान

एमपीसी न्यूज – आर. अश्विनने केलेल्या दमदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंड संघासमोर विजयासाठी 482 धावांचं आव्हान दिलं आहे. कर्णधार विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंचा धैर्याने सामना केला. या दोघांनी 96 धावांची भागीदारी करत भारताच्या डावाला चांगला आकार दिला.

विराट कोहली 62 धावांवर बाद झाल्यानंतर अश्विन यानं सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेत संघाची धावसंख्या वाढवली. तळाच्या फलंदाजांना हाताशी धरत अश्विननं कसोटी कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलं. अश्विन यानं 148 चेंडूचा सामना करताना 106 धावांची संयमी खेळी केली.

अश्विन आणि विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पहिल्या डावातील शतकवीर रोहित शर्मा 26 धावांवर बाद झाला. शुबमन गिल 14 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर बाद झाले. पहिल्या डावांत अर्धशतकी खेळी करणारे ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावांत मात्र अपयशी ठरले. त्यांनी अनुक्रमे 8 आणि 10 धावा काढल्या. त्यानंतर अक्षर पटेल 7, कुलदीप यादव 3 आणि इशांत शर्मा 7 धावांवर बाद झाले. मोहम्मद सिराज 16 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून फिरकीपटू मोईन अली आणि जॅक लीच यांनी प्रत्येकी 4-4 बळी मिळवले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.