Ind vs Eng Test Series : भारतासमोर विजयासाठी 420 धावांचे आव्हान; अश्विनचे सहा बळी

एमपीसी न्यूज – पहिल्या डावात 241 धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक 6 बळी घेत इंग्लंड संघाला 178 धावांवर रोखलं. भारतीय संघाला विजयासाठी 420 धावांचं आव्हान दिलं आहे.

दुसऱ्या डावांत भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत इंग्लंड संघाला 178 धावांवर रोखलं. फिरकीपटू आर. अश्विन यानं सर्वाधिक 6 बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. इशांत शर्माने कसोटीत 300 बळींचा टप्पा पूर्ण केला.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला 337 धावांवर रोखण्यात इंग्लंड संघाला यश आले. त्यानंतर इंग्लंडला 241 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात बर्न्स पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (16), डॅन लॉरेन्स (18), बेन स्टोक्स (7) आणि जो रूट (40) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले.

भारतीय संघासमोर आता 420 धावांच आव्हान आहे. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि शुबमन गिल, पंत यांच्या फलंदाजीवर संघाच्या विजयाची मदार आहे. दरम्यान, रोहित शर्मा 12 धावांवर लिचच्या चेंडूवर त्रिफळाचित झाला. सध्या चेतेश्वर पुजारा (4) व शुबमन गिल (13) धावांवर खेळत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.