Ind Vs Eng Test Series : भारताचा इग्लंडवर 317 धावांनी विजय, अक्षर पटेलने घेतले पाच बळी

एमपीसी न्यूज – इग्लंड व भारतीय संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना भारतीय संघाने 317 धावांनी जिंकला. अक्षर पटेलने इग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत विजयात मोठा वाटा उचलला. त्याने 60 धावा देत 5 बळी घेतले तर, आर अश्विनने देखील तीन बळी घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

चेपॉकच्या खेळपट्टीवर 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकला. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राअखेर इंग्लंड संघानं सर्व गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या करता आल्या. इंग्लंड कडून सर्वाधिक 43 धावा मोईन अलीने केल्या तर, कर्णधआर जो रूटने 33 धावा केल्या. चार कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.

चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय फिरकीपटूंसमोर पुन्हा एकदा इंग्लंडच्या फंलदाजांनी नांगी टाकली. तीन बाद 52 वरुन चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर अश्विन यानं लॉरेन्सला बाद करत भारताला आजच्या दिवसातील पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर बेन स्टोक्सचाही अडथळा अश्विन यानेच दूर केला. अक्षर पटेल यानं आज ओली पोपला बाद करत भारताला विजयासमीप नेलं.

कुलदीप यादव यानं सत्राच्या अखेरच्या षटकांत फोक्सला बाद करत भारताला सातवं यश मिळवून दिलं. त्यानंतर कर्णधार जो रूट 33 धावा करून अक्षर पटेलच्या चेंडूवर झेलबाद झाला आणि ओली स्टोनला अक्षर पटेलने लेग बिफोर केले. भारताकडून अक्षर पटेल यानं 5, आर अश्विनने 3 तर कुलदिप यादवने दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावसंख्या
भारत पहिला डाव – सर्वबाद 329
इंग्लंड पहिला डाव – सर्वबाद 134
भारत दुसरा डाव – सर्वबाद 286
इंग्लंड दुसरा डाव – सर्वबाद 164
भारत 317 धावांनी विजयी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.