Ind Vs Eng Test Series : रोहित शर्माची 161 धावांची खेळी, दिवस अखेर भारत सहा बाद 300

एमपीसी न्यूज – रोहित शर्माने केलेल्या 161 आणि अजिंक्य रहाणेच्या 67 धावांच्या जोरावर भारताने पहिल्या दिवस अखेर सहा बाद 300 धावांपर्यंत मजल मारली. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाल्यानंतर, रोहित आणि अजिंक्य रहाणेने डाव सावरला. सध्या मैदानात पंत 33 तर अक्षर पटेल 5 धावांवर खेळत आहे.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल शून्यावर बाद झाला. रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराच्या साथीने डाव पुढे नेला. पण पुजारा 21 धावांवर माघारी परतला. लगेच विराट कोहली देखील शून्यावर त्रिफळाचीत झाला.

त्यानंतर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी 152 धावांची भागीदारी केली. यांच्या भागीदारी दरम्यान रोहितने कसोटीतील सातवं तर चेन्नईच्या मैदानावर आपलं पहिलं शतक ठोकलं.

रोहित 161 धावा काढून बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे अर्धशतकी खेळी करून त्रिफळाचीत झाला. त्याने 149 चेंडूत 67 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनदेखील 13 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंत (33) आणि अक्षर पटेल (5) धावांवर खेळत आहेत.

इंग्लंडकडून लीच आणि अली दोघांनी 2-2 गडी बाद केले तर स्टोन आणि रुट यांनी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.