India: विकास आणि कोरोना व्यवस्थापनाविषयी ईशान्य क्षेत्र आदर्श- जितेंद्र सिंग

India: Northeast Region Ideal on Development and Corona Management - Jitendra Singh

एमपीसी न्यूज- मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या वर्षात ईशान्य विकास मंत्रालयाने केलेल्या कामगिरीची पुस्तिका आणि ई-आवृत्तीचे प्रकाशन ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी केले. यावेळी त्यांनी कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी ईशान्य भागामध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थापनाचे कार्य संपूर्ण देशाच्या दृष्टीने अनुकरणीय आदर्श ठरल्याचे म्हटले.

डॉ. जितेंद्र सिंग म्हणाले की, ईशान्य क्षेत्र अनेक गोष्टींचा विचार केला तर एक आदर्श विभाग म्हणून उदयास आला आहे. गेल्या सहा वर्षांमध्ये या पूर्वोत्तर भागामध्ये झालेल्या अनेक विकासकामांकडे विकासाचे आदर्श ‘मॉडेल’ म्हणून पाहिले जात आहे.

त्याचप्रमाणे कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी ईशान्य भागामध्ये ज्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यात आले, ते कार्यही संपूर्ण देशाच्या दृष्टीने अनुकरणीय आदर्श ठरले आहे.

आता टाळेबंदीनंतर ज्या वेगाने नियमित कामकाज या राज्यांमध्ये केले जात आहे, तेही कौतुकास्पद आहे.

गेल्या सहा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भागाच्या विकास कामांना ज्या प्रकारे प्राधान्यक्रम दिला आणि सर्व प्रकारची काळजी घेवून या भागामध्ये विकासकार्य केले त्यामुळेच आता या क्षेत्रातली परिस्थिती वेगाने सुधारत आहे.


या क्षेत्राच्या विकासकामांसाठी 2019-20 मध्ये मंजूर झालेला निधी 100 टक्के खर्च करून कामे पूर्ण केल्याबद्दल डॉ. जितेंद्र सिंग यांनी सर्व ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालयाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.

त्यामुळेच आता या भागातले रस्ते, रेल्वे आणि हवाई जोडणी यांची कामे पूर्ण होवू शकली आहेत. ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये दळणवळणाची उत्तम साधने उपलब्ध होवू शकत आहे.

इथल्या लोकांचा प्रवास आता अधिक सुलभ, सुकर झाला आहे. तसेच या भागात मालवाहतूक करणेही खूप सुविधाजनक झाले आहे. या क्षेत्रातून केवळ आजूबाजूच्या राज्यांमध्येच नाही, तर संपूर्ण देशामध्ये सहजतेने माल पाठवणे आणि मागवणे शक्य झाले आहे.

पार्सल सेवेव्यतिरिक्त यंदा या भागामध्ये 400 टनांपेक्षा जास्त माल हवाई कार्गोने आला आहे. कोविड महामारीनंतर जाहीर केलेल्या पॅकेजमुळे आता बांबू व्यवसायाला विशेष उत्तेजन मिळेल, अशी अपेक्षा आहे. या क्षेत्रामध्ये तरूण उद्योजक नवसंकल्पना आणून आपला वेगळा ठसा उमटवतील.

ईशान्य क्षेत्रामध्ये गेल्या एक वर्षामध्ये पायाभूत सुविधा आणि ऊर्जा तसेच इतर क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण आणि लक्षवेधी विकास झाला आहे, असं मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

केंद्र सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणामुळे या राज्यांसाठी 53,374 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त 4,745 कोटी रूपयांचा निधी दिला आहे. त्याचबरोबर 10% GBS ही देण्यात आल्यामुळे या भागात वेगाने विकासकामे होत आहेत, असेही सिंग म्हणाले.

ईशान्य क्षेत्रासाठी गेल्या एक वर्षामध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांची तसेच ज्या महत्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत, त्या सर्वांची माहिती डॉ. सिंग यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.