हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट (लेखांक दुसरा)

(सतीश वसंत वैद्य)

चित्रपटसृष्टी व संगीत भारतीयांच्या भावविश्वाचा एक अभिभाज्य भाग, कप्पा आहे. त्या दृष्टीने शास्त्रीय संगीताचा सिनेमातील वापर आणि एकूणच सिनेसंगीत कशाप्रकारे बदलत गेल याचा थोडक्यात लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न……(लेखांक दुसरा)

एमपीसी न्यूज-  शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट या विषयी लिहिताना,चर्चा करताना 1931 पासून साधारण 1990 पर्यंतचाकाळ विचारात घेतला आहे. या काळात या विषयी बरीच उलथापालथ झाली, बरच काम झालं. नंतर सिनेमात शास्त्रीय संगीतावर गाणी झाली पण लोकांची जशी मागणी तसा पुरवठा’या प्रमाणे चित्रपट निर्मीती हा एक धंदाच असल्यामुळे तसं संगीत दिल गेलं. या सगळ्यात एका महान कलाकाराच नाव घेतलं नाही तर घोर पाप होईल ते म्हणजे आपल्या चित्रपटसृष्टिचे पहिले ‘सूरसम्राट, सुपरस्टार….. कुंदनलाल सहगल..!

1931 ते40 या दशकात सहगलनी बरेच हिट सिनेमे दिले.1935 साली पहिला ‘देवदास’ सहगलन केला होता. एकाच थिएटरमधे सलग ऐंशी आठवडे हा सिनेमा चालला. हा त्यावेळेचा सर्वांत मोठा रेकाॅर्ड होता.1940 ला जिंदगी नावाचा केदारनाथ शर्मांनी एक चित्रपट बनवला होता. त्यात आजही ज्या अजून विविध व्यक्तिरेखा उभ्या करणार्या ‘आशालता वाबगांवकर’यांनी सहगल व पहाडी सन्याल यांचे बरोबर काम केले होते.मी परव्हां हे वाचले तो आश्चर्यच वाटले. काय बाईंनी स्वतःला व आपल्या कामाला मेनटेन केलय!!नतमस्तक आम्ही!!या जिंदगी मधील पंकज मलीक यांनी गायलेलं ‘मै क्या जानू क्या जादू रे’हे टाॅपच गाणं आजची मुलही गायचा प्रयत्न करतात आणि कार्यक्रमातून गातात.

1943 ला आलेला ‘तानसेन’हा चित्रपट आपल्या दृष्टिने महत्वाचा ! संपूर्ण चित्रपट फक्त शास्त्रीय संगीतच. कुंदनलाल सहगल कोणाही उस्तादाकडे संगीत शिकलेले नव्हते पण अगदी वयाच्या चार पांच वर्षापासूनच स्टेजवर रेडिओवर प्रोग्राम केले.सर्वांना आश्चर्य वाटे त्याच्या गाण्याचं.या तानसेनला संगीत दिल होत खेमचंद प्रकाश यांनी.बरसो रे बरसो रे,काहे गुमान करे,सप्तसूर तीन ग्राम हे संगीतशास्त्रावरच आडा चौतालातल गीत आणि दीपक रागावर गाजलेलं’दिया जलाओ..जगमग जगमग दिया जलाओ’ हे गाण.ही सर्व गाणी अजरामर झाली.

1960 आणि 1970 च्या दशकांतल्या आम्हा तरूण मंडळीना रेडिओ सिलोन फार आवडायचं.आम्हा भारतीयांच चित्रपट व चित्रपटसंगीताशी खूप जवळचं भावनीक नातं आहे.आमच सर्वांच भावविश्व त्याच्याशी निगडीत आहे. तेव्हांची गाणी पण अशी आहेत की कोणी विसरू शकत नाही. अमूक अमूक गाणं ऐकू आलं की आम्ही आमच्या त्या रम्य दिवसात जातो व त्या आठवणींनी रिचार्ज होतो. रेडिओ सिलोन सकाळी साडेसहाला सुरू व्हायचं. ’एकही फिल्मके गीत’ आजके कलाकार हे झाले की रोज साडेसातला ‘पुरानी फिल्मोंके गीत या कार्यक्रमाचा शेवट अगदी रोज 7-57वाजता सहगलच्या गाण्यानेच होत असे. मीअलिकडे वाचल होत की ही परंपरा सतत 47 वर्ष टिकली म्हणे.तर आम्हा मुंबईकरांना हा आठचा सहगलच्या गाण्याचा अलार्म असायचा…चला ..मग लवकर लवकर आवरून ठराविक वेळेची ठराविक लोकल पकडायची आणि चर्चगेट किंवा व्ही.टी.च आॅफीस !

सहगलची गाणी सर्व शास्त्रीय बेसवर..बालम आये बसो मेरे मनमें, एक बंगला बने न्यारा, ऐ दिले बेकरार सून, जब दिलही टूट गया, ग़म दिये मुस्तकील, बाबूल मोरा, दो नैना मतवाले तिहारे, चाह बरबाद करेगी, यातल गाण आणि पटापट आवरून लोकलसाठी धावत जाण आठवतं अजून! वरील ‘बालमआए बसो मोरे मनमें’आणि ‘दुःखके दिन अब बितत नाही’ ही दोन्ही देवदास मधील गाणी, सिनेमाचे संगीत दिग्दर्शक जरी तिमिर बरन होते तरी त्या गाण्यांची रचना के.एल. सहगलनी केली होती. देवदासनी शास्त्रीय संगीत त्या काळात आम जनतेच्या तोंडी सहजासहजी बसेल इतकं सोप करून टाकल होतं.

सहगल बद्दल खूप सार ऐकून झालय.1940 पासून किंवा थोड मागेपुढे त्यांना दारूच व्यसन लागलं. नंतर तर दारू शिवाय गाणं गात नसत, बैठकीच होत नसत, रेकाॅर्डिंगला दारू शिवाय गात नसत असं म्हणायचे. कदाचित व्यसनाचे आहारी गेल्यामुळे वयाच्या फक्त बेचाळीसाव्या वर्षीच 1947 साली त्यांना देवाज्ञा झाली. भारतीय चित्रपटसृष्टी एका फारमोठ्या कलाकाराला मुकली. अजून खूप मोठ काम सहगलनी केल असतं. के.एल.सहगल यांच्या खर्जातल्या गाण्याची नक्कल बरेच नकलाकार करीत. अमूक अमूक गाणं सहगलनी गायल तर कस वाटेल याची नक्कल, मिमिक्री करून हशा मिळवित. कधी कधी त्या गाण्याची चेष्टा केली जायची, पण मला त्या लोकांना सांगावस वाटत की आधी तुम्ही सहगलाना नीट ऐका. दुसर म्हणजे त्या काळात जसं संगीत पब्लिकला आवडायच तस पुरवल गेल.

सहगल पुराणानंतर आपण परत माझ्या मागच्या लेखाकडे जाऊ ज्याचा शेवट बसंत बहार या सिनेमान केला होता. 1953 मध्ये ‘अनारकली’हा सिनेमा आला होता. त्याला सी.रामचंद्र यांच संगीत होतं. तो पूर्ण व्हायच्या आधी अनारकलीसाठी अनिल विश्वास यांनी काही गाणी तयार केली होती पण का माहीत नाही, त्यांच नांव रद्द झालं व सी.रामचंद्र यांच्याकडे तो सिनेमा आला. अनिल विश्वास यांनी केलेली गाणी एका सुमार चित्रपटासाठी वापरली गेली. त्याचं नांव होत ‘मान’! ह्या गोष्टीचा जाणकारांनी खेद व्यक्त केला होता. या शास्त्रीय संगीतावरील सिनेमासाठी अण्णांनी 12-13 गाणी घातली होती पैकी अकरा लता मंगेशकर, एक गीता दत्त व एक द्वंद्व लता व हेमंतकुमार यांच ‘बागेश्री रागावर ‘जाग दर्दे इश्क जाग’ हे खूप लोकप्रिय झालं.

1957 साली ‘सुवर्णसुंदरी’या साधारण चित्रपटासाठी आदि नारायणराव या दाक्षिणात्य संगीतकाराने एकाच गीतात चार अंतरे, कडवी चार रागात सादर करण्याचा एक नवीन प्रयोग केला तो लोकांना फार आवडला. ते सुपरहिट गीत ‘कूहू कूहू बोले कोयलिया’! मुखडा व पहिल कडवं सोहोनी,नंतर बहार अडाणा व शेवटच यमन असे चार राग घेतले. हे गाणं अजून ही वेगवेवळ्या कार्यक्रमात लोकं आवर्जून घेतात. सुवर्णसुंदरीमध्ये अजून एकदोन गाणी, मालकंसवर मुझे ना बुला वगैरे होती चांगली. पण बाकी लाईट म्यूझिकवर होती.

हळूहळू आख्खा सिनेमा रागदारीवर बघत ऐकत बसण्यापेक्षा हलकंफुलकं गाण लोकाना आवडायला लागल आणि सर्व गाणी करण्यापेक्षा दोन तीन शास्त्रीय व बाकी लाईट अस संगीत येऊ लागलं. आता परत अभिजात संगीत मागे पडतय अस वाटत असतानाच शंकर भट प्राॅडक्शनस् नी म्हणजे भट बंधूनी एक जबरदस्त फक्त शास्त्रीय संगीतावर आधारीत कलाकृती आणली ‘गूंज ऊठी शहनाई’!!

गूंज ऊठी वर बरच चरविचरण करता येईल. पहिल याची कथा आपल्या गदिमा ग. दि.माडगूळकर यांची होती. दिग्दर्शक विजय भट. संगीत…वसंत देसाई आणि उ.बिस्मिल्ला खान यांचे सनईने तर धूमाकूळ घातला होता. उ.अमीर खाँ यांचं भरपूर गाणं आलापि सोबत सनई यामुळे तीन तास कुठे कधी सटकून जायचे कळायचंच नाही. राजेंद्रकुमार, अमीता वगैरे कलाकारांनी चांगली काम केली होती. हिरो किशन लहानपणापासूनच सनई वाजवायचा. त्याला ईश्वरी देणगी होती. गुरूजींकडून गंडा बांधायच्या आधी बालपणी हा गुरूजींचा पहाटेचा रीयाज ऐकायचा व तसेच सूर सनईमधून काढायचा. गुरूजींनी एकदा त्याची सनई ऐकली व कुठून आवाज येतोय म्हणून पाहीलं तर पकडला गेला. तो आणि त्याची बालमैत्रीण दोघही घाबरली पण गुरूजींनी त्याला छातीशी कवटाळलं खूप प्रसंशा केली व शागिर्द बनवला. या प्रसंगांचे वेळी उ.अमीर खाँ व सनई एकदम अविस्मरणीय !!

सिनेमात या दोन उस्तादांनी जबरदस्त रागमाला सादर केली आहे.त्याची क्लिप नेटवर ऐकायला मिळेल. रागमालेत…भटियार, देसीतोडी,शुद्धसारंग, मुलतानी, रामकली, यमन, बागेश्री,चंद्रकंस असे राग रंगवले आहेत. हिरो किशन रागमालेच्या सुरवातीला लहान दाखवलाय. तेव्हां साथीला तबलजी दाखवला आहे. तो ह्या गुरूशिष्यांच्या रीयाजासाठी तबल्याची साथ करत असतो व द्रूतलयीत वाजवताना घामाघूम वगैरे होतो…अस वाजवत वाजवत हिरो मोठा होतो. राजेंद्रकुमार दिसतो. हिरोईनही मोठी तरूणी होते, गुरूजीही म्हातारे दिसतात पण गंमत म्हणजे तो तबलजी जसा सुरवातीला दिसतो तसाच !! लोकं ते अप्रतिम संगीत ऐकण्यात एवढे गूंग होऊन जायचे की ही बारीकशी चूक कुणाच्याच लक्षात आली नाही. आमच्यासारखे खडूस बरोब्बर दाखवत..पण ती गाणं व सनईची जुगलबंदी अगदी अवर्णनीय अविस्मरणीय!!!

आणखी एक गंमत …बिस्मिल्ला खान यांनी सनईवर राग मालकंस वाजवला होता.त्यांत..’टट टॅटा टटट टॅ .ट टट टट, टट टटँ टटट टँ’ सूर मालकंसचे आठवा. अशी धून इतकी पाॅप्यूलर झाली की लग्नाची बोलणी वगैरे यथायोग्य झाली की ताईचा भाऊ आनंदान टट टॅटँ म्हणायचा तिला चिडवायला.आमच्या पिढीला हे नक्कीच आठवेल. कहर असा की सध्या आॅन लाईन …लग्न जुळवायच्या साईटस् च्या जाहिरातीमध्ये हीच धून वाजते..साठ वर्षापासून…!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'8774e57da89110ba',t:'MTcxMzYxMzYxNi4xNDgwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();