हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि आपले चित्रपट

(सतीश वसंत वैद्य)

चित्रपटसृष्टी व संगीत भारतीयांच्या भावविश्वाचा एक अभिभाज्य भाग, कप्पा आहे. त्या दृष्टीने शास्त्रीय संगीताचा सिनेमातील वापर आणि एकूणच सिनेसंगीत कशाप्रकारे बदलत गेल याचा थोडक्यात लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न……

एमपीसी न्यूज- आलमआरा हा पहिला भारतीय बोलपट 4 मार्च1931 रोजी मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमात प्रदर्शित झाला हे आपल्याला माहीत आहेच.यांत भारतीय संगीताची पहिली सात गाणी होती. प्रथम पुरूष गायक वजीर महंमदखान होते व नायिका गायिका होती झुबेदा. त्यातील काही गाणी झिलूबाई म्हणजे मदरइंडिया मधील नरगीसची सासू आणि मुगलेआज़म मधील अनारकलीच्या आईची भूमिका करणारी अभिनेत्री यांनी म्हटली होती.

1931 ते 1940 या काळातील चित्रपट संगीताला नाट्यसंगीत असेच म्हणावे लागेल. कारण संगीत नाटकांची लोकप्रियता डोळ्यांसमोर ठेवूनच ते बनवल जायचं शिवाय मुंबईमध्ये व मराठी वातावरणात मराठी लोकांमधेच ते चित्रपट संगीत तयार केलं जायचं. साहजिकच त्यावर नाट्यसंगीताचा प्रभाव पडलेला दिसायचा. चित्रपटाचे एकूण स्वरूप एकूण संगीत नाटकासारखेच असायचे. आपण कधी त्या काळचे सिनेमे पहिले तर, त्यातील पात्रांच्या हालचाली, डायलाॅग बोलायची पध्दत अगदी नाटकासारखी वाटते. न्यू थिएटर्स, बाँबे टाॅकीज, प्रभात या चित्रसंस्थांनी ते बदलण्याचा प्रयत्न केला. तरीही शांतारामबापूंच्या जुन्या सिनेमातील डायलाॅग बोलायची पध्दत नॅचरल वाटत नाही.

1933 सालीं आलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटाच्या गाण्यांची पहिली ध्वनिमुद्रिका HMVने काढली होती.एकूण सोळा गाणी होती पैकी चार गाण्यांच्या दोन रेकाॅर्डस् विनायकराव पटवर्धन यांच्या होत्या. संगीत प्राणसूख एम.नायक यांचे. “परम सखी तू कमला मोहे” हे त्यातील एक गाणं विद्याहरण नाटकातील “सूर सखी धनी तू विमला, करीमाला “या गाण्याची हुबेहूब काॅपी होती. या गोष्टीचा हवाला गोविंदराव टेंबेंनी त्याच्या एका पुस्तकात दिला आहे. त्या काळी विनायकराव पटवर्धन, गोविंदराव टेंबे, गोहर कर्नाटकी, बेगम अख्तर, फिरोज दस्तूर, केशवराव गोरे, कृष्णराव चोणकर ही शास्त्रीय संगीतातील मातब्बर मंडळी हिंदी सिनेमात नट, गायक, संगीतकार म्हणून काम करायचे. पण पुढील चारपाच वर्षातच लोकांना त्याचा कंटाळा आला. कारण मराठी नाटकात जे संगीत ऐकायचे तेच परत हिंदीमधे. त्यामुळे हिंदी सिनेसंगीत संपतय की काय अशी वेळ आली होती.

पण त्याचवेळी 1951-52 मध्ये नौशाद या संगीत दिग्दर्शकाने पूर्णपणे शास्त्रीय संगीताचा, वेगवेगळ्या रागांचा उपयोग, तयारीचे गायक वादक वगैरे मंडळींसह योग्य वाद्यमेळ रचून हिंदी चित्रपटाकडे लोकांना आकृष्ट केलं. ‘बैजूबावरा’ बद्दल अनेक कथा आहेत. उस्ताद अमीरखाँ व पं.डी.व्ही.पलूसकर यांच्या सारख्या महान मंडळीना गायची विनंती केली व त्यांनीही मान राखून मान्य केल व ‘बैजूबावरा’मधे अजरामर कलाकृती सादर केल्या आणि हिंदी सिनेमात प्रथमच पार्श्वगायन केलं. 1952 नंतर दोनअडीच वर्षांतच म्हणजे 1955 साली पलुस्करांच निधन झाल. नंतर लोकांना त्यांचा आवाज कधीच ऐकायला मिळाला नाही. उ.अमीर खाँ आणि पं.पलुस्कर यांच्या अभिजात संगीताबरोबरच “बैजूबावरा”ने मोहंमद रफी यांच्या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. तो पर्यंत रफींच्या गाण्याचा शास्त्रीय संगीतात वापर करायचा विचार कोणी केला नव्हता.”ओ दुनियाके रखवाले”या दरबारी रागावर आधारीत गाण्यापासूनच रफींच टिपेतील गाण सुरू झालं.

बैजूबावराचे अगोदर हिराबाई बडोदेकरांना घेऊन 1947मधे “ललत” नावाचा चित्रपट आला होता पण चालला नाही. ‘बैजूबावरा’नंतर 53 मधेही अजून एक शास्त्रीय संगीतावर आधारित सिनेमा आला होता तोही चालला नाही. त्याचे नांव होते “हमदर्द”. मग शांताराम बापूंनी जिद्दीनं गोपीकृष्ण या उत्तम नर्तकास घेऊन “झनक झनक पायल बाजे” हा शास्त्रीय संगीताचाच चित्रपट आणला आणि त्यात नृत्यकलेची भर घातली. संगीत होते वसंत देसाई यांचे. टेक्नीकलर अशी भव्यदिव्य कलाकृती प्रेक्षकांना खूप आवडली. आणली. यात पुन्हा रफी आशा यांचे एकही गाणे नाही.फक्त मन्ना डे ची मुख्य गाणी, केशवराव दाते यांची भूमिका व पं.सामंताप्रसाद यांच्या तबल्यावर गोपीकृष्ण आणि संध्या यांची नृत्ये. एवढ्यावर त्या सिनेमाने सिल्वर जूबिली साजरी केली. मुंबईच्या लिबर्टी सिनेमागृहात तीही उ.बडे गुलाम अली खाँ,अमीर खाँ, पं.पलुस्कर या सर्वांच्या उपस्थितीत…त्यांच्या गायन मैफिलीसहित !!!

हे सगळ घडत असताना इतर संगीतकार येतच होते. वेगवेगळे प्रयोग करत होते. आपल्या हिंदी सिनेमात 1937 साली पं.केशवराव भोळे यांनी एक आंग्ल कवि लाँगफेलो यांची “in the world’s bread,a field of battle”अशी,जीवन विषयक तत्वज्ञान सांगणारी,कविता जशीच्यातशी घेतली होती. गंमत म्हणजे गायिका कोण ? तर आपली मराठमोळी शांता आपटे !. केशवराव भोळे यांनी केलेला पार्श्वसंगीताचा पहिला प्रयोग 1937 मध्ये के. एल. सैगल यांच्या आवाजात “एक बंगला बने न्यारा” या शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यानेच.

नवे शंकर जय किशन,ओ.पी.नय्यर,किशोरकुमार,आशा भोसले,पाश्चात्य वाद्ये,रंभासंभा,राॅक अँड रोल वगैरे सारखे काँपिटिटर हिंदी चित्रपटसृष्टीत शिरत होते.पण त्याच बरोबर आपले अभिजात संगीतही जपायचा प्रयत्न जाणकार करीत होते.1955/56चे दरम्यान जेव्हां शास्त्रीय संगीतावर “बसंत बहार” काढायचा विचार चालला होता तेव्हां बर्याच खोल विचारांती शंकर जयकिशन हेच नांव पक्के झाले.याचे थोडे आधी “चोरी चोरी “ला एस जे नी उत्तम संगीत दिलं होत.त्यातील एक गाण शुध्द कल्याण रागावर आधारीत होते- “रसिक बलमा”हे लोकांनी खूप उचलून धरले.”चोरी चोरी”च्या घवघवीत यशामुळे एस जेना “बसंत बहार” मिळाला.

बैजूबावरा मधील उ.अमीर खाँ आणि पं.पलुस्कर यांची जुगलबंदी लोकांना फार आवडली होती.तशीच एस जेनी पं.भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांना घेऊन करायची ठरवल्यावर मन्ना डे म्हणाले “या जुगलबंदीत मन्नाडे भीमसेन जोशींना हरवतो हा मोठा विनोद आहे” खरं आहे.आणि या उत्फूर्सपणे बोलण्यांत त्यांच मोठेपण दिसतं. पण “केतकी गुलाब जूही चंपकबन “ हीच ती जुगलबंदी अमर झाली.मोठमोठ्या गायकांची जुगलबंदी ही एक त्याकाळी रसिक, दर्दी,जाणकारांसाठी पर्वणीच असायची.

साधारण 1940 ते47 दरम्यान स्वातंत्र्य लढा,जातीय दंगली वगैरे कारणांमुळे कदाचित देशात अस्थिरता होती. देशाच विभाजन,स्थलांतरं इत्यादींमुळे दर्जेदार कलाकृती झाल्या नसाव्यात. नंतर 1949-50 चे आसपास लोकांमधे उत्साह दिसू लागला..असो.

बसंत बहार या माईलस्टोन शास्त्रिय संगीता वरील चित्रपटानंतरचा इतिहास पुढील भागात पाहू.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.