Pimpri news : दिव्यांगांचे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार, प्रहार क्रांती आंदोलनाचा पिंपरी येथे आनंदोत्सव
एमपीसी न्यूज : दिव्यांगांचे स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय होणार असल्याने प्रहार क्रांती आंदोलनाच्या वतीने पिंपरी येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.(Pimpri news) या आनंदोत्सवासाठी सुमारे 400 ते 500 दिव्यांग बांधव जमले होते.
राज्यातील दिवंगांची प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. प्रहार क्रांती आंदोलनाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या लढ्याला यश आल्याने प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या दिव्यांग कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आज आनंदोत्सव साजरा केला. या आनंदोत्सवासाठी सुमारे 400 ते 500 दिव्यांग बांधव जमले होते. त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला. तसेच हलगीच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला.
शहर प्रमुख दत्तात्रय भोसले, उपशहर प्रमुख राजेंद्र वाकचौरे, महिला शहर प्रमुख संगीता जोशी, ज्ञानदेव नारखेडे, रामचंद्र तांबे, विद्या तांदळे, राजू विटकर व आदींनी जल्लोषात सहभाग घेतला. तसेच महापालिकेतील दिव्यांग कक्षाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनीही जलदर्शक सहभाग घेतला. त्यांनी दिव्यांग प्रतिनिधींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
एमपीसी न्यूजशी बोलताना उपशहर प्रमुख राजेंद्र वाकचौरे म्हणाले की, ” आम्ही दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलने केली आहेत. राज्यातील दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रहार क्रांती आंदोलनाचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यासाठी गेली 25 वर्षे लढा दिला आहे. विधानसभेच्या सभागृहात याबाबत त्यांनी मागणी केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 नोव्हेंबर रोजी राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आज आम्ही ही मागणी पुर्ण झाल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आनंदोत्सव साजरा केला आहे.”