IPL 2020 : सुपरओव्हरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची मुंबईवर मात

एमपीसी न्यूज – रंगतदार सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सवर सुपरओव्हरमध्ये मात केली. बंगळुरुकडून नवदीप सैनीने सुपरओव्हर टाकली यामध्ये मुंबईचा संघ 7 धावांपर्यंत मजल मारु शकला. बंगळुरुला विजयासाठी 8 धावांचं सोपं आव्हान मिळालं.

मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सुपरओव्हर टाकतानाही भन्नाट मारा केला. परंतू शेवटच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना विराटने चौकार लगावला आणि बंगळुरुला पहिला विजय मिळवून दिला.

मुंबईकडून सुरुवातीला इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने बंगळुरु विरुद्धचा सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं.

विजयासाठी एका चेंडूत पाच धावांची गरज असताना कायरन पोलार्डने चौकार लगावत सामना बरोबरीत सोडवला. त्याआधी 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी-कॉक, हार्दिक पांड्या हे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. परंतू इशान किशन आणि कायरन पोलार्ड यांनी संयमी खेळ करत शतकी भागीदारी केली आणि सामना रंगतदार अवस्थेत आणला.

इशान किशनने 58 चेंडूत 2 चौकार आणि 9 षटकारांसह 99 धावा केल्या. अवघ्या एका धावाने त्याचं शतक हुकलं. पोलार्डने 60 धावा करत त्याला चांगली साथ दिली. आयपीएलच्या तेराव्या हंगामातली ही दुसरी सुपरओव्हर ठरली.

सलामीवीर फिंच, पडीकल यांची अर्धशतकं आणि एबी डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर बंगळुरुने मुंबई विरोधात 201 धावांचा टप्पा गाठला. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

फिंच-पडीकल जोडीने आश्वासक सुरुवात करुन संघाची बाजू भक्कम केली. परंतू मोक्याच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात यश मिळवलं. परंतू अखेरीस डिव्हीलियर्सने केलेल्या फटकेबाजीमुळे बंगळुरु ने आश्वासक धावसंख्येपर्यंत मजल मारली. मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत डिव्हीलियर्सनेही नाबाद 55 धावांची खेळी केली.

सलामीवीर फिंच आणि पडीकल यांनी बंगळुरुला चांगली सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत दोन्ही फलंदाजांनी सामन्यावर बंगळुरुचा वरचष्मा निर्माण केला. फिंचने फटकेबाजी करत आपलं अर्धशतकही साजरं केलं.

ट्रेंट बोल्टने फिंचला माघारी धाडत बंगळुरुला पहिला धक्का दिला. फिंच 35 चेंडूत 52 धावा काढून माघारी परतला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने 7 चौकार आणि एक षटकार लगावला. यानंतर मैदानावर आलेला कर्णधार विराट कोहली फारशी चमक दाखवू शकला नाही.

मधल्या षटकांत बंगळुरुच्या धावगतीवर अंकुश लावण्यात मुंबईचे गोलंदाज यशस्वी ठरले. राहुल चहरच्या गोलंदाजीवर विराट कोहली अवघ्या तीन धावांवर माघारी परतला. यानंतर मैदानात आलेल्या एबी डिव्हीलियर्सने देवदत पडीकलसोबत फटकेबाजी करुन संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. पडीकलनेही एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक झळकावलं. त्याने 54 धावांची खेळी केली.

यानंतर डिव्हीलियर्स आणि शिवम दुबे यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत बंगळुरुला सामन्यात दमदार पुनरागमन करुन दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्टने 2 तर राहुल चहरने एक बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.