Kangana Trolled: कंगनाच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट

रितेश देशमुख, दिग्दर्शक अभिनव सिन्हा, डिझायनर फरहान खान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, स्वरा भास्कर, रिचा चड्ढा यांनी कंगनाला याबद्दल सुनावले आहे.

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या मुंबईवरील ट्वीटमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली असल्याचे दिसत आहे. अनेकजण कंगनाला याबद्दल चांगलेच सुनावत आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी कंगनावर टीका केली आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावर सतत वेगेवगळे मत मांडणाऱ्या कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरुन शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते.

तसेच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असे ते म्हणाल्याचे कंगना म्हणाली होती. पण त्यांना प्रत्युत्तर देत कंगनाने ट्विटमध्ये ‘मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे वाटते का’? असे म्हटले. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी कंगनाच्या या वक्तव्यावरुन तिला खडे बोल सुनावले आहेत.

दिग्दर्शक समीर विद्वांसने उत्तर दिलं आहे. ‘प्रिय कंगना मॅडम, मुंबई हे या देशातील सर्वात आकर्षक शहर आहे. या शहराने तुम्हाला सर्व काही दिलं. तुम्ही त्याला काय दिलं? हे? तुमची राजकीय विचारसरणी काहीही असो तुम्ही कोणाच्याही बाजूने असो तुम्हाला आमच्या प्रिय शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याचा हक्क नाही. विषय संपला.’ असं समीर म्हणाला आहे.

समीरबरोबरच बॉलिवूडमधील अन्य सेलिब्रिटींनीही मुंबई आम्हाला प्रिय असल्याचे सांगत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे कंगनाच्या विधानाचा समाचार घेतला आहे. रितेश देशमुख, दिग्दर्शक अभिनव सिन्हा, डिझायनर फरहान खान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, स्वरा भास्कर, रिचा चड्ढा यांनी कंगनाला याबद्दल सुनावले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.