Karjat : एकही नुकसनाग्रस्त मदतीपासून वंचित राहता कामा नये, काळजीपूर्वक पंचनामे करा – श्रीरंग बारणे

Don't be deprived of any help, do Panchnama carefully - Shrirang Barne

एमपीसीन्यूज – ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे. या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता कामा नये. त्यासाठी सर्व नुकसानग्रस्तांचे काळजीपुर्वक पंचनामे करावेत. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.

मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत, खालापूरमधील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आज (सोमवारी) आढावा घेतला.

कर्जत येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रांताधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र घुले, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, नगरसेवक संतोष पाटील, वेद दांडेकर, नगरसेविका प्राची देरवणकर, शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू घारे उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. त्यात कर्जत, खालापूर, उरण, पनवेल तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे.

या नुकसानीची 100 टक्के भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यासाठी पंचनामे सुरु झाले आहेत. एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहू नये. ज्यांच्या पिकांचे, आब्यांचे, झाड आणि घरांचे नुकसान झाले आहे.

त्याची 100 टक्के भरपाई दिली पाहिजे. बाधित शेतकरी, नागरिकांना मदत मिळण्यासाठीचे सर्व पंचनामे काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. सर्वांना मदत मिळाली पाहिजे. त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा.

कर्जत, खालापूरमधील दुर्गम भागात आदिवासी पाडे मोठ्या प्रमाणात आहेत. पाड्यांवरील घरांची कौल, पत्रे उडून गेली आहेत. त्यांनी स्व:खर्चाने तात्पुरती दुरुस्ती करुन घेतली आहे.

त्यांना सरकारी मदत मिळावी याबाबत राज्याचे पुर्नवसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. चार ते पाच दिवसात राज्य सरकारच्या वतीने बाधितांना आर्थिक मदत दिली जाईल.

तोपर्यंत नुकसानग्रस्तांचे बँक खाते क्रमांक, आधार कार्ड हे कागदपत्रे जमी केली जातील. त्यानंतर बाधितांच्या खात्यात नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

वादळाचा महावितरणाला देखील फटका बसला आहे. विद्युत तारांवर झाडे पडली आहेत. अनेक ठिकाणचे पोल पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. पण, खेड्यापड्यातील वीजेची अद्यापर्यंत दुरुस्ती झाली नाही. येत्या चार ते पाच दिवसात ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महावितरणे सांगितल्याचेही खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.