Katraj Crime News : जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमात मद्यपी भावकीत तुंबळ हाणामारी, चार जण अटकेत

एमपीसीन्यूज : मद्यपान करून आलेल्या भावकीतील चुलत्या पुतण्याने जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमात गाणं म्हणण्याचा हट्ट धरल्यानंतर निर्माण झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी केली. प्रकरण पोलिसात गेले आणि त्यानंतर पोलिसांनी यातील चौघांना अटक केली. पुण्याच्या कात्रज परिसरात हा प्रकार घडला.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात विकास जनार्धन गवळी (वय 44) यांनी तक्रार दिली आहे. तर सागर सुभाष गवळी (वय 21), सुवन सतीश गवळी (वय 22), सावन सुभाष गवळी (वय 23) आणि पवन सतीश गवळी (वय 25, रा. बिबवेवाडी) या चौघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास यांच्या कात्रज येथील घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. या आयोजित कार्यक्रमाला नातेवाईक असलेल्या चौघांना बोलवण्यात आले होते. हे चौघेही फिर्यादी यांचे चुलते -पुतणे लागतात. दरम्यान, कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हे चौघे मद्यपान करून आले.

त्यांनी गोंधळाच्या कार्यक्रमात ‘आम्हाला गाणे म्हणू द्या’, म्हणून हट्ट धरला. यावरून वाद झाल्यानंतर त्या चौघांनी नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येईल, अशा पध्दतीने अंधाधुंद दगडफेक करत गोंधळ घातला.

तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी व मुलाला मारहाण करत त्यांना जखमी केले आहे. या प्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.