Bhosari : आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी स्वतःचे अस्तित्व टिकवण्याचा शेवटचा प्रयत्न – खासदार गिरीश बापट

महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांची भोसरीत भव्य विजयी संकल्प सभा 

एमपीसी न्यूज – आगामी निवडणूक राज्याच्या आणि देशाच्या हिताची आहे. पन्नास वर्षात राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांना जे जमलं नाही ते फडणवीस सरकारने केवळ पाच वर्षात केलं. अस्तित्व टिकवण्याचा काँग्रेसचा शेवटचा प्रयत्न आहे. त्यांचा दिवा लवकरच मालवणार आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
भोसरी येथे महायुतीची विजय संकल्प सभा झाली. या सभेत खासदार गिरीश बापट बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, महायुतीचे भोसरी विधानसभेचे उमेदवार आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, सभागृहनेता एकनाथ पवार, शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे, कामगार नेट्व इरफान सय्यद, महायुतीच्या घटकपक्षातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
खासदार गिरीश बापट म्हणाले, “राष्ट्रवादीच्या पक्षाचा पैसा नागरिक कधीच स्वीकारणार नाहीत. आगामी निवडणूक राज्य आणि देशाच्या दृष्टीने महत्वाची आहे. विरोधकांना पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी उमेदवार देखील मिळाला नाही. विलास लांडे हसण्यात एक नंबर, फसवण्यात दोन नंबर आणि कामात तीन नंबर आहेत, असे म्हणताच एकच हशा पिकला.

बापट पुढे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते एकमेकांसोबत भांडत आहेत. पक्षात सन्मानाची वागणूक न मिळाल्याने राष्ट्रवादीचे अनेक नेते नाराज आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी देशातील दोन राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागताच देशाबाहेर गेले. यांना जनतेबद्दल गांभीर्य नाही. आमदार महेश लांडगे यांनी मागील पाच वर्षात विकासाचा ध्यास घेतला. विकासाचे ध्येय घेऊन ते काम करतात. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी भामा आसखेडचे पाणी आणले जात आहे. अनेक प्रश्न तडीस नेले आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडणून देण्याचे आवाहन खासदार बापट यांनी उपस्थितांना केली.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “महायुतीचा विजय निश्चित आहे. राज्यात सर्वाधिक मताधिक्य भोसरी विधानसभा मतदारसंघातून मिळणार आहे. मतदारसंघात अजून विकासकामे करायची आहेत. त्यासाठी आमदार महेश लांडगे यांचे नेतृत्व गरजेचे आहे.”
महेश लांडगे म्हणाले, “विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत. त्यांनी जनतेला कायम फसवलं आहे. रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी सहा वेळा पुण्यात येऊन बैठका घेतल्या आहेत. विरोधक त्यांच्यावर टीका करीत आहेत. रेडझोनचा प्रश्न सोडवण्यासाठी विरिधकांनी कधीच प्रयत्न केला नाही. शस्तिकरसुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातच जनतेवर लादला गेला. आजवर समाजाला एकसंघ बांधून विकास करण्याचे काम आम्ही केले आहे.
रुपी बँकेचे विलीनीकरण, स्पाईनरोड बंधितांचा प्रश्न सोडवला आहे. बधितांना प्लॉट उपलब्ध करून दिला. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू केले. कायदा सुव्यवस्था राखण्याचा हा महायुतीचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पाणीप्रश्न, कचराप्रश्न, यावर उपाय केले. संतपीठ बांधण्यासाठी जिल्हाधिका-यांकडून जागा मंजूर करून घेतली. विकासाचे सर्व मुद्दे घेऊन नागरिकांसमोर गेलो आहे. प्रचार करताना सर्व नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त मिळाला आहे. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
सुलभा उबाळे म्हणाल्या, “महायुतीचे कार्यकर्ते एकीने काम करत आहेत. पक्षस्तरावर मतभेद कायम केले. पण व्यक्तिगत टीका कधीच केली नाही. आमदार महेश लांडगे यांनी ‘पोलिटिक्स विथ रिस्पेक्ट’ ही नवीन संकल्पना घालून दिली. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना समान संधी दिल्या. शिवसेना महायुतीचा धर्म कटाक्षाने पाळणार आहे. आमदार लांडगे यांचा पुन्हा एकदा विजय निश्चित असल्याची खात्री त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.