Loksabha election 2024 : पक्षांतर केलेल्या नेत्यांची चांदी,पक्षप्रवेश करताच 7 जणांना उमेदवारी जाहीर
एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची चांदी झाल्याची दिसून येत आहे. पक्षांतर करताच राज्यातील काही नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी विविध पक्षांतर्फे उमेदवारी मिळाली आहे. जे नेते बऱ्याच वर्षांपासून एकाच पक्षात निष्पक्षपणे काम करत आहेत ते मात्र पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार), राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना(एकनाथ शिंदे गट) या सर्व पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असताना दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील (शिरूर) आणि अर्चना पाटील (धाराशिव) लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे तर शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील (माढा), निलेश लंके(दक्षिण नगर) आणि बजरंग सोनवणे (बीड) या आयात केलेल्या तीन नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
कॉंग्रेसचे उमरेड येथील आमदार राजू परवे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश करून रामटेकमधून निवडणूक (Loksabha election 2024) लढवणार आहेत तर करण पवार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. करण पवार यांनी गेल्याच आठवड्यात भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
कोणतीही निवडणूक आली की प्रत्येक पक्षाला बंडाळी आणि पक्षांतराला खडतरपणे सामोरे जावे लागते पण आयात केलेल्या उमेदवारांमुळे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या नाराजीचे सूर मात्र विविध पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना ओढवून घ्यावा लागतो. जरी पक्षांतर करून आलेले नेते या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचे भवितव्य आजमावत असले तरी शेवटी मतदारराजा मतदान पेटीतून या सर्व आयात झालेल्या नेत्यांचे राजकीय भविष्य ठरवतील हे मात्र निश्चित !