Lonavala : मतांचे विभाजन टाळण्याकरिता आघाडीचा धर्म पाळा -हर्षवर्धन पाटील
पुणे जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा वाद संपुष्टात
एमपीसी न्यूज- समविचारी पक्षांचे होणारे मतांचे विभाजन टाळण्याकरिता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्माचे पालन करावे असे आवाहन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपस्थितीमध्ये लोणावळ्यात काँग्रेसचा मेळावा आज, रविवारी संपन्न झाला. त्यावेळी पाटील बोलत होते.
माजी खासदार अशोक आण्णा मोहोळ, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जगताप, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, रामभाऊ बराटे, सोमनाथ दौंडकर, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, विलास बडेकर, यादवेंद्र खळदे, निखिल कविश्वर, प्रमोद गायकवाड, भानुदास खळदे, गणेश काजळे, पुष्पा भोकसे, गटनेत्या आरोही तळेगावकर, पुजा गायकवाड, संध्या खंडेलवाल, सुवर्णा अकोलकर, बाळासाहेब शिर्के, संजय घोणे, हाजीमलंग मारिमत्तु, विलास मालपोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
- हर्षवर्धन पाटील म्हणाले, ” केवळ मतांचे विभाजन झाले म्हणून 2014 च्या निवडणुकीत देशात केवळ 39 टक्के मते मिळालेला जातीयवादी भाजपा पक्ष सत्तेत बसला. यावेळी मात्र तशी चुक करायची नाही. मतांचे विभाजन टाळण्याकरिता देशातील समविचारी 21 पक्ष काँग्रेसच्या सोबत आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील आहे. जातीयवादी सरकारला सत्तेतून पायउतार करण्यासोबत दिल्लीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याकरिता लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे. ही आपली अस्तित्वाची लढाई असल्याने सर्व मतभेद बाजुला ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने आघाडीचा धर्म पाळायचा आहे”
“जी खंत कार्यकर्त्यांची आहे तीच आमची देखील आहे. मात्र ही वेळ आपापसात वाद घालण्याची नसून जातीयवादी पक्षांना रोखण्याची व मतांचे विभाजन टाळण्याची असल्याने काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आघाडीच्या प्रचारयंत्रणेत सहभागी व्हावे असा पक्षादेश आला आहे, त्याचे काटेकोर पालन करावे” असे पाटील यांनी सांगितले.
- जिल्हाध्यक्ष संजय जगताप, मोहोळ, बराटे यांनी देखील आघाडीचे काम करण्याच्या सूचना मेळाव्यात केल्याने पुणे जिल्ह्यातील आघाडीतील वाद संपुष्टात आला आहे.