Lonavala : खंडाळा घाटातील ऐतिहासिक अमृतांजन पूल झाला 189 वर्षांचा !

एमपीसी न्यूज- पुणे व रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा ऐतिहासिक ब्रिटिशकालिन अमृतांजन पूल हा मागील रविवारी (10 नोव्हेंबर) तब्बल 189 वर्षांचा झाला. इतिहासाची साक्ष देणारा हा पूल आजही मोठ्या रुबाबात येणार्‍या जाणार्‍याचे स्वागत करत आहे.

पुणे व रायगड जिल्ह्याला जोडणारा हा ऐतिहासिक पूल खंडाळा घाटात इंग्रज अधिकारी सर कँप्टन ह्युजेस यांनी मेजर जनरल जाँन मालकोल्म जी.सी.ई. अँनो डोमिनी यांच्या मार्गदर्शनाखाली 1830 साली बोरघाटातील रेल्वेच्या रिव्हसिंग पाँईट येथे बांधण्यात आला. 10 नोव्हेंबर 1830 साली या पुलाचे लोकार्पण करण्यात आले होते.

पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार अशी ओळख असलेला हा प्राचीन पूल ब्रिटीशकाळात जेव्हा दळणवळणाची साधने नव्हती. त्या काळात ब्रिटीश अधिकार्‍यांनी सह्याद्रीची नाळ कोकणाशी जोडण्यासाठी 189 वर्षांपूर्वी बांधला होता.

खंडाळा बोरघाटातील या पुलांवर वेदनानाशक अमृतांजन बामची जाहिरात काही काळ झळकल्यानंतर या पुलाला अमृतांजन पूल हे नाव पडले व तीच पुढे त्यांची ओळख झाली. अमृतांजन पुलावरुन पूर्वी वाहतुक होत असे. कालांतरांने हा पूल जिर्ण झाल्याने त्याला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला आहे. या पुलावर उभे राहिले असता निसर्गरम्य खंडाळा घाटातील विहंगम दृष्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वे गाडी आदींचे दर्शन होते.

पर्यटकांसाठी तो एक महत्वाचा पिकनिक स्पॉट तसेच सेल्फी पाॅईट बनला आहे. मुंबई व कोकणातील जिवघेण्या गरमीमधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणुक जाणवते. मागील काळात हा ऐतिहासिक पूल वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे कारण देत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या मात्र माध्यमांनी या विरोधात उठविलेला आवाज व नागरिकांच्या हरकती नंतर निर्णय थांबविण्यात आला.

सध्या लोणावळा ते खालापुर दरम्यान मिसिंग लिंकचे काम सुरु असल्याने अमृतांजन पुलाला सध्या तरी कोणता धोका नाही. इतिहासाची साक्ष देणारा तसेच दोन जिल्ह्यांना जोडणार्‍या ह्या अमृतांजन पुलाची ऐतिहासिक वारसा यादी नोंद करत त्याचे जतन व संगोपन करावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.