Mahalunge : हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावी रंगले क्रांती कविसंमेलन
एमपीसी न्यूज- क्रांतिदिनानिमित्त (9 ऑगस्ट) पिंपरी चिंचवड शहरातील कवींनी हुतात्मा बाबू गेनू यांच्या जन्मगावी महाळुगे पडवळ येथे जाऊन शहीद बाबू गेनू यांच्या आठवणी कवितेतून जागवल्या. बाबू गेनू यांचे जन्मस्थळ, स्मारक व हुतात्मा बाबू गेनू विद्यालय अशा तीन ठिकाणी हे कविसंमेलन रंगले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिर्के होते. या क्रांती कविसंमेलनाला बाबू गेनू यांचे पुतणे पांडुरंग धनाजी सैद, किसन कुशाबा सैद, महाळूगे पडवळ गावचे सरपंच तुकाराम आवटे, ग्रामविकास अधिकारी मनोज भुजबळ, माजी जिल्हा परिषद सदस्य दादाभाऊ चासकर, शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कवयित्री राधाबाई वाघमारे व्यासपीठावर उपस्थित होते.
भारत माता की जय, वंदे मातरम या घोषात बाबू गेनू यांना वंदन करून कविसंमेलनाला सुरुवात झाली. बाळासाहेब घस्ते यांनी “ये मेरे वतनके लोगो “हे गीत सादर केले. आईची महती अनिल दीक्षित यांनी कवितेतून सांगितली. कवी सुभाष चव्हाण, आय. के. शेख, तानाजी एकोंडे, मधुश्री ओव्हाळ, अंतरा देशपांडे, आत्माराम हारे, रघुनाथ पाटील,डॉ. पी. एस. आगरवाल,उमेश सणस, यांनी देशभक्तीच्या हुंकाराच्या कविता सादर केल्या. शोभा जोशी यांनी मुलांसमवेत ‘ 1942 चा क्रांतिदिन 9 ऑगस्ट, ही रचना सादर करुन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत पेटवली.
प्रकाश घोरपडे यांनी भैरवी म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन शब्दधनचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केले तर आभार बाबू गेनू विद्यालयाचे शिक्षक बाळासाहेब खानदेशे यांनी मानले.