Maharashtra Budget 2021 : राज्याच्या अर्थसंकल्पातील महत्वाचे दहा मुद्दे

एमपीसी न्यूज – राज्याचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा 10 हजार 226 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला. आरोग्य व्यवस्थेतील दोष दूर करण्याबरोबरच त्यात सुधारणा करण्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत.

अर्थसंकल्पातील महत्वाचे दहा मुद्दे

1) तीन लाख रुपये मर्यादेपर्यंत पिककर्ज घेणाऱ्या, वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2021 पासून शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठा करणार.

2) राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2021 पासून घरखरेदीची नोंदणी त्या घरातील महिलेच्या नावावर झाल्यास प्रस्थापित मुद्रांक शुल्कात सवलत दिली जाणार.

3) मुंबई, ठाणे व नवी मुंबई यांच्याभोवती असलेल्या जलमार्गाचा वापर करून पहिल्या टप्प्यात वसई ते कल्याण मार्गावर जलवाहतूक सुरू करण्यात येईल. त्यासाठी गोलशेत, कालेम, डोंबिवली आणि मीरा-भाईंदर या चार ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहे.

4) मुंबईतील 14 मेट्रो लाइन्सचे 337 किलोमीटर लांबीचे काम प्रगतीपथावर असून त्या करता 1,40,814 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सर्व 17 मेट्रोलाइन्सची कामे प्रगती पथावर आहे.

5) बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून वरळी, वांद्रे, धारावी, घाटकोपर, भांडुप, वर्सोवा व मालाड येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणार.

6) 17.17 किमी. वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू झाले असून या प्रकल्पाची अंदाजे किंमत 11 हजार 333 कोटी रुपये आहे.

वांद्रे-वर्सीवा-विरार या सागरी सेतू प्रकल्पाची अंदाजे किंमत 42 हजार कोटी रुपये असून प्रकल्पावर काम सुरू आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाची किंमत 6,600 कोटी रुपये असून कामाची निविदाविषयक कार्यवाही सुरू आहे. मुंबई शहरातील सात उड्डाणपूलांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

7) सिंधुदुर्ग, धाराशिव-उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवी शासकीय महाविद्यालये. अमरावती आणि परभणी येथेही स्थापना.

8) जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 7,500 कोटी किमतीचा प्रकल्प तयार केला असून येत्या चार वर्षांत तो पूर्ण करण्यात येईल.

9) राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी मोफत बसप्रवास. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू करण्यात येणारी राज्यव्यापी योजना.पर्यावरणपूरक दीड हजार सीएनजी व हायब्रिड बसेस उपलब्ध होणार.

10) मोठ्या शहरातील महिलांच्या सुरक्षितेतसाठी तेजस्विनी योजनेअंतर्गत आणखी बसेस उपलब्ध होणार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.