Maharashtra Corona Update: शनिवारी रुग्णवाढीचा उच्चांक! मृतांचा आकडाही 10 हजारांच्या पुढे!
Maharashtra Corona Update: Highest Rise in patients on Saturday! The death toll exceeds 10,000! राज्यातील 1 लाख 36 हजार 985 रुग्ण कोरोनामुक्त, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 55.55 टक्क्यांवर!
एमपीसी न्यूज : राज्यात काल (शनिवारी) नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. राज्यात दिवसभरात तब्बल 8 हजार 139 नवे कोरोना बाधितांची नोंद झाली. तर 223 मृत्यू मागील चोवीस तासांमध्ये नोंदवले गेले आहेत. या संख्येमुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्येने आता दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
राज्यात आतापर्यंत 10 हजार 116 रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 4 हजार 360 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2 लाख 46 हजार 600 इतकी झाली आहे. यापैकी 1 लाख 36 हजार 985 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 99 हजार 303 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात 6 लाख 80 हजार 17 लोक होम क्वॉरंटाइन आहेत. तर 47 हजार 376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइन आहेत. आत्तापर्यंत 12 लाख 85 हजार 991 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ज्यापैकी 2 लाख 46 हजार 600 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 55.55 टक्के इतके झाले आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे महत्वाच्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या लॉकडाऊन लागू आहे. मात्र, कोरोनाबाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी याठिकाणी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.