Maharashtra Corona Update : राज्यात आज 65,934 जणांना डिस्चार्ज, 15 जिल्ह्यात रुग्णांची घट

एमपीसी न्यूज – राज्यात आज नव्यानं वाढ झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 65 हजार 934 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील मुंबई, ठाणे, नाशिकसह पंधरा जिल्ह्यात रुग्ण संख्येत घट झाल्याचे आरोग्य राजेश टोपे यांनी सांगितले.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यात आज 51 हजार 880 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यासह राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 48 लाख 22 हजार 902 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 41 लाख 07 हजार 092 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 41 हजार 910 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज 891 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर एकूण 71 हजार 742 जण कोरोनामुळे मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा, तर रिकव्हरी रेट 85.16 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेट पेक्षा अधिक आहे.

सध्या राज्यात 39 लाख 36 हजार 323 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 30 हजार 356 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 81 लाख 05 हजार 382 नमूने तपासण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पंधरा जिल्ह्यात रुग्ण वाढ घटली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, नांदेड, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.