Maharashtra Police : पोलीस पाटलांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार सकारात्मक : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

एमपीसी न्यूज – गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारा महत्त्वपूर्ण घटक हा पोलीस पाटील आहे. कोरोना काळात पोलीस पाटील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कौतुकास्पद कार्य केले आहे. पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे, त्यावर गृह विभागाने त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांनी दिले.

मंत्रालयात गृहराज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री देसाई म्हणाले, पोलीस पाटील यांनी कोरोना  कालावधीत अत्यंत जबाबदारीने फ्रंट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे. गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलीस पाटलांची असते. कोरोना काळात काळात पोलीस पाटलांनी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी खूप चांगल्या पध्दतीने पार पाडली असून या कामाचे कौतुकही देसाई या बैठकीदरम्यान केले.

पोलीस पाटलांच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, शासनातर्फे विमा योजना सुरू करणे, निवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करणे, निवृत्तीनंतर ठोस रक्कम अथवा पेन्शन मिळणे, अनुकंपा तत्व लागू करणे, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई देणे व सरकारी सेवेत सामावून घेणे,

शासन निर्णयानुसार प्रवास भत्ता, प्रशिक्षण व इतर योजनांची अंमलबजावणी करणे, इतर गावांचा अतिरिक्त कार्यभार दिल्यास त्याचा अतिरिक्त भत्ता मिळावा, पोलीस पाटील कोविड काळात मृत्युमुखी पडल्यास शासन निर्णयानुसार 50 लाख रुपये भरपाई मिळावी, या प्रमुख दहा मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. गृह विभागाने या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवून कार्यवाही करावी, असे यावेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.