Mahesh Kale : गायक महेश काळे यांचे वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारे ‘विठ्ठला’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला

Singer Mahesh Kale's song 'Vitha' conveyed the message of global unity याविषयी बोलताना कवी-गीतकार वैभव जोशी म्हणाले की लॉकडाऊनमुळे यंदा आषाढी वारी रद्द झाली आहे. आम्ही मित्र एकत्र येऊन गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा विठ्ठलाच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करत आहोत.

एमपीसी न्यूज –  गायक महेश काळे, कवी- गीतकार वैभव जोशी आणि संगीतकार नरेंद्र भिडे यांनी ‘विठ्ठला हे एक ‘युनिक’ गाणे तयार केले आहे, ज्याचे बोल उर्दू भाषेत आहेत. या गाण्याच्या व्हिडिओत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून जी वारी टिपली आहे त्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला आहे. 

संदेश भंडारे आणि योगेश पुराणिक यांनी वारीत टिपलेल्या काही छायाचित्रांचाही यात समावेश आहे. डॉन स्टुडिओची निर्मिती असलेल्या या गाण्याचे ध्वनिमिश्रण तुषार पंडित यांनी केले असून प्रेझेंटर लीड मीडियाचे विनोद सातव आहेत. या गाण्यासाठी सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी कुठलेही मानधन न घेता काम केले आहे.

याविषयी बोलताना कवी-गीतकार वैभव जोशी म्हणाले की, कोरोना, लॉकडाऊनमुळे यंदा आषाढी वारी रद्द झाली आहे. आम्ही मित्र एकत्र येऊन गाण्याच्या माध्यमातून आपली सेवा विठ्ठलाच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे गाणे विठ्ठलावरचे असले तरीही उर्दूमध्ये लिहिले असल्यामुळे ते आगळे-वेगळे झाले आहे. माझे बालपण मंगळवेढा येथे गेले, तेव्हा अनेक पीरबाबांना वारी मध्ये सहभागी झालेले पाहिले होते. ते वारी मध्ये जातात, विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी होतात, त्यांना जर काही म्हणावेसे वाटले तर ते काय म्हणत असतील? त्यांच्या भावना उचंबळून आल्या तर ते कुठल्या पद्धतीने व्यक्त होत असतील? ते सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे.

या गाण्याबद्दल बोलतांना प्रसिद्ध गायक महेश काळे म्हणाले, या वर्षी वारी होऊ शकत नसल्यामुळे देवापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आम्ही या गाण्याची निर्मिती केली आहे. शिवाय या गाण्याच्या व्हिडीओमध्ये  महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ‘एरियल फोटोग्राफी’चा अत्यंत कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. मी अभंग-भजन या सांप्रदायात लहानाचा मोठा झालो असल्यामुळे अभंग गातांना मला जो आनंद मिळतो तो एक विलक्षण अनुभव असतो. पुढे ते म्हणाले की हे गाणं करतांना आमच्या डोक्यात एक कल्पना आली की जर महाराष्ट्राची परंपरा माहित नसलेला एखादा सुफी संत वारीच्या काळात महाराष्ट्रात आला तर त्याच्यासाठी अनोळखी असलेली ही परंपरा त्याच्या दिव्यत्वामुळे त्याला त्याच्या ओळखीची वाटली तर तो या परंपरेच्या बद्दल आपुलकीने कसा व्यक्त होईल हे दर्शवणारे हे गाणं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.