Manobodh by Priya Shende Part 85 : मनोबोध भाग 85 – भजा राम विश्राम योगेश्वराचा

एमपीसी न्यूज – मनाचे श्लोक क्रमांक 85 – Manobodh by Priya Shende Part 85
भजा राम विश्राम योगेश्वराचा
जपू नेमिला नेम गौरी हराचा
स्वये निववी तापसी चंद्रमाैळी
तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी
ह्या श्लोकात समर्थांनी पुन्हा एकदा शंकर-पार्वतीचे उदाहरण दिले आहे.
पहिल्या चरणात ते म्हणतात की,”भजा राम विश्राम योगेश्वराचा”. रामनाम हा योगेश्वराचा, कृष्णाचा, शिवशंकराचा विश्राम आहे. राम भजल्यामुळे वेदना, शीण हे कमी होतात. त्यामुळे आराम वाटतो. मुळात आराम.. विश्राम या शब्दातच राम आहे.
या रामाला भजल्यामुळे, रामनामाचा जप केल्यामुळे, एक प्रकारची विश्रांती मिळते. आराम वाटतो. नवी ऊर्जा मिळते. हा रामनामाचा घोष साक्षात शिवशंकर करतात. याचा महिमा लोकहो आपण जाणून घ्या.
पुढे ते सांगताहेत, “जपू नेमीला नेम गौरीहराचा”. गौरी म्हणजे देवी पार्वती आणि हर म्हणजे महादेव. जपू नेमीला नेम.. त्यांनी हा जप अव्याहात चालू ठेवलाय. त्या रामनामाच्या जपाचा नेम केलाय. हा जपयज्ञ करायचं ठरवलंय. एखादा नेम केला की तो नीट पार पाडायचा असतो. तसा या दोघांनी विश्रामासाठी मोठ्या भक्ती भावाने हा जप यज्ञाचा नेम केला आहे. विश्वाच्या कार्यासाठी विष सुद्धा घेऊन, स्वतःचा दाह कमी करण्यासाठी, स्वतःला आराम पडावा म्हणून, स्वतःला शांतता (Manobodh by Priya Shende Part 85) मिळावी म्हणून, भगवान शंकर राम नाम जपत आहेत.
पुढच्या चरणात ते म्हणताहेत की, “स्वये निववी तापसी चंद्रमौळी”. चंद्रमौळी म्हणजे शंकर महादेव जे की तापसी आहेत, तपस्वी आहेत. ते स्वये निववी म्हणजे रामनामाने स्वतःचा दाह शांत करतात, शमवतात.
पुढे समर्थ म्हणताहेत की, “तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी”. जेव्हा माणूस देहभावात आहे तेव्हाच त्याला या देहातून सुटायचं आहे आणि मोक्षाकडे गतिमान व्हायचा आहे. तर यातून अंतकाळी सोडवणारा हा रामच आहे. तर त्याचं नाव सतत आपल्या मुखात असू द्या. वाणीत असू द्या. चित्तात असू द्या. हृदयात असू द्या. परावाणीने स्फूर्ती रूपात येऊ द्या. शेवटच्या क्षणापर्यंत हे राम नाम येण्यासाठी त्याचा सराव आतापासूनच करावा लागतो. आपलं कार्य करता करता सतत रामनामाची कास धरावी, तरच अंतकाळी सुद्धा ओठात राम नाम येईल. अंतकाळी तोच सोडवणार आहे.
PMAY : पंतप्रधान आवासच्या आकुर्डी, पिंपरीतील सदनिका धूळखात
परमेश्वर हा कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. तो संतांच्या ठायी असतो. संत आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. दिशा दाखवतात त्यानुसार आपण मार्गक्रमण केलं, भक्ती भावाने प्रभुच्या चरणी लीन झालोत, शेवटच्या क्षणापर्यंत रामनाम भक्तीभावन (Manobodh by Priya Shende Part 85) घेतलं, तर श्रीराम तुम्हाला नक्कीच मोक्ष देईल, असं समर्थ सांगताहेत.
जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590