Maratha Reservation News : केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे – ॲड. लक्ष्मण रानवडे

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर या समाजाला महाराष्ट्राच्या 52 टक्के आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागेल किंवा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. किंवा आरक्षणाची 50 टक्के मर्यादा उठवून मराठा समाजाला मिळालेले 12 टक्के आरक्षण मोदी सरकारने द्यावे. आरक्षण प्रकरणी मराठा समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ताकदीनिशी मागणी करावी लागेल, तरच हे कठीण कार्य सुलभ होऊ शकेल, असे मत पिंपरी चिंचवड शहर मराठा सेवा संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी व्यक्त केले.

ॲड. रानवडे म्हणाले, ‘मराठा समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण रद्द करून सुप्रीम कोर्टाने जबरदस्त धक्का दिला आहे. वास्तविक पाहता मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती न देता खंडपीठाकडे वर्ग केलं असते तर काहीअंशी हा प्रश्न मिटला असता.

आरक्षणाची पन्नास टक्के केलेली मर्यादा उठविण्यासाठी अपवादात्मक स्थिती असावी लागते, म्हणजेच आरक्षणाची मागणी करणारा समाज अत्यंत दुर्लक्षित, सर्व समाजापासून तुटलेला दुर्लक्षित समाज असावा अशी धारणा कोर्टाची आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे 43 टक्के संख्येने असलेला मराठा समाज हा दुर्लक्षित अथवा समाजापासून कसा दूर असू शकेल ? एक वेळेस सधन असलेला हा समाज आज अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. मराठा समाजातील काही टक्के समाज सोडल्यास आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकरित्या मागास आहे. म्हणून मराठा आरक्षण मिळणे आवश्यक आहे, असे मत रानवडे यांनी व्यक्त केले.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर या निकालाविरुद्ध रिव्ह्यू ॲप्लिकेशन करून पुन्हा दाद मागावी लागेल असेही रानवडे म्हणाले. पण यात किती यश मिळेल हि शंकाच असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर, त्याला महाराष्ट्राच्या 52 टक्के आरक्षणामध्ये समाविष्ट करून घ्यावे लागेल किंवा केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. किंवा आरक्षणाची 50 टक्के मर्यादा उठवून मराठा समाजाला मिळालेले 12 टक्के आरक्षण मोदी सरकारने द्यावे, असे रानवडे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.