Pimpri : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
एमपीसी न्यूज – माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ करून तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ओटास्किम निगडी येथे घडली.
रजाक गायकवाड (वय 48, रा. खानापूर फाटा, एमआयडीसी, परभणी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर बबन जाधव आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा सागर जाधव (वय 20, रा. ओटास्किम, निगडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशा यांचा सागर याच्याशी 2016 मध्ये विवाह झाला. मात्र लग्नाच्या एक वर्षानंतर निशा यांना माहेरहून सोन्याची अंगठी आणण्याची मागणी केली जात होती. त्यावरून त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ देखील केला जात होता. सागर याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार मारहाण केली. या जाचाला कंटाळून निशा यांनी २९ जुलै रोजी ओटास्किम निगडी येथील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. यावरून सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.