Pimpri news: सांडपाणी फेरवापर करण्याचा ‘मास्टर प्लॅन’

चार ठिकाणी उभारणार प्रकल्प , महासभेची मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात पिण्याव्यतिरिक्तचा वापर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने मास्टर प्लॅन केला आहे.
सांडपाण्यावर चार ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यातील पाण्याचा फेरवापर करण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने आज (गुरुवारी) मान्यता दिली.

शहरातील मलनि:सारण केंद्राद्वारे प्रक्रिया केली जाते. त्यातील प्रक्रियायुक्त पाण्याचा शहरातील औद्योगिक व निवासी भागात पुरवठा करण्यासाठी सल्लागारामार्फत विस्तृत आराखडा तयार केला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी खाजगी-सार्वजनिक भागिदारी (पीपीपी) तत्त्वावर किंवा हॅम मोडनुसार करण्यास प्रस्तावास मंजुरी प्राप्त झाली आहे. आराखड्यानुसार संपूर्ण शहरासाठी प्रतिदिन 120 दशलक्ष लिटर प्रक्रियायुक्त पाण्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो.

भाग एक : पिंपळे सौदागर, वाकड, हिंजवडी एमआयडीसी, चिंचवड
भाग दोन : चिखली एमआयडीसी, चऱ्होली
भाग तीन : निगडी, प्राधिकरण व तळेगाव एमआयडीसी
भाग चार : चाकण एमआयडीसी  रचनेनुसार प्रकल्पाचे चार भाग केले आहेत.

माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या चर्चेतून अनेक गोष्टी समजतात. वेगळे मुद्दे पुढे येतात. मात्र सत्तेवर असलेल्या सत्ताधीशांना कुठल्याही गोष्टीची चर्चा करायची नाही का असा एकंदरीत चित्र सभागृहात  दिसून येत आहे. आता सत्ताधाऱ्यांकडून सभागृहात जे सुरू आहे ते नक्कीच वस्तुपाठ घेण्यासारखे नाही .  चांगल्या गोष्टी कायम लक्षात राहतात याचे महापौरांनीही भान ठेवावे.

राष्ट्रवादीची देखील पंधरा वर्षे सत्ता होती.  मी पाच वर्षं पक्षनेता म्हणून काम पाहिले. सभागृहात कोणाला बोलू दिले नाही असे कधीच केले नाही. प्रत्येक गोष्टी सध्या सल्लागारांच्या ऐकल्या जातात. सल्लागारांशी चर्चा केली जाते.त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मेंदूला खरंच गंज लागला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

माजी महापौर योगेश बहल म्हणाले, महापौर तुम्ही ज्या पक्षातून आलेल्या आहात तो काळ आठवा. त्या काळात कोणत्या सदस्याला बोलू दिले नाही किंवा त्याची गळचेपी केली.सभागृहात चर्चा केली नाही. अशी परिस्थिती होती का?  सभागृह म्हणजे लोकशाहीचे मंदिर आहे. येथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा नैतिक अधिकार आहे. घाईघाईत कोणतीही चर्चा न करता विषय मंजूर करण्याची एवढी गरज का आहे.

आपल्या सभागृहात पाच मिनिटात हजारो कोटी रुपयांच्या वर्षभराच्या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली जाते. एवढी घाई नक्की कशासाठी केली जाते आहे. सत्ताधारी  नगरसेवक देखील या विरोधात आता बोलू लागले आहे. कारण त्यांनाही कळून चुकले आहे की गेल्या पाच वर्षात आपण आपल्या भागात  नक्की काय करू शकलो आहे. सभागृहात आपल्या प्रभागाचे प्रश्न नक्की कितपत मांडू शकलो.

विषय मंजूर करायचा आणि त्यानंतर त्यावर चर्चा करायची अशी वेळ नगरसेवकांवर येत असेल तर यासारखी शोकांतिका नाही . मात्र अशी चर्चा चर्चा करणे देखील आता गरजेचे झाले आहे. कारण शहरातील नागरिकांना देखील कळले पाहिजे नक्की सत्ताधारी सभागृहात काय करत आहेत.

भाजपच्या आशा शेंडगे म्हणाल्या, पाण्याचा फेरवापर करण्याचा विषय आल्यानंतर सहाजिकच कोणत्याही सदस्याला याबाबत बोलायला नक्की आवडेल. कारण पाणीटंचाई हा भविष्यातील मोठा गहन प्रश्न आहे. म्हणून मी देखील हातवर केला. परंतु तुम्ही मला बोलू दिले नाहीच शिवाय कोणतीही चर्चा न करता हा विषय मंजूर केला. हा प्रकार खरंच संमती देण्यासारखा नाही. चर्चा करा किमान  बोलू तरी द्या. एवढे तरी लोकशाहीच्या मंदिरात लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, 2018 मध्ये पाण्याचे मोठे दुर्भिक्ष शहरात निर्माण झाले होते .त्यामुळे पाण्याचा तुटवडा प्रचंड प्रमाणात जाणवत होता पाणीटंचाईमुळे पाण्याचा पुनर्वापर करण्याची चर्चा सातत्याने होत होती. पाणी ट्रिटेड करणे आवश्यक आहे. हे समोर आल्यानंतर त्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आला. त्याद्वारे पाण्याचा तुटवडा दूर होईल अशी अपेक्षा आहे.

त्यासाठी पहिल्या टप्प्यात हिंजवडी आणि त्यानंतर चिखली, मोशी, चऱ्होली, कासरवाडी हे भाग  निवडण्यात आले .पाणी  ट्रिटेड करण्यासाठी हेम् टेक्नॉलॉजी किंवा पीपीपी तत्त्वावर हा उपक्रम राबवला जावा असे प्रस्तावित आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय मान्यतेसाठी हा विषय सभागृहासमोर ठेवण्यात आला आहे.

आयुक्त राजेश पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाचे माॅडेल शहराचा आपण विचार करतो, तेव्हा सांडपाणी पुनर्वापर आवश्यक आहे. आपण सकारात्मक दृष्टिने विचार करून आव्हाने स्विकारायला हवे. संभाजीनगर प्रकल्प पुन्हा सुरू करू. भविष्यात सांडपाणी पुनर्वापर गरजेचे आहे.

असा आहे प्रकल्प!

#वाकड, पिंपळ सौदागर, पिंपळे गुरव, कासारवाडी, चिंचवड, चिखली, चऱ्होली व एमआयडीसी क्षेत्रात #कासारवाडी येथून 75, चिखलीमधून 20 व चऱ्होली  येथून पाच असे प्रतिदिन सुमारे 100 दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध करणे. त्यापैकी आठ दशलक्ष लिटर पाणी पिण्याच्या गुणवत्तेचे शुद्ध करण्यासाठी आरओ प्रणालीचा वापर करणे
#प्रक्रियायुक्त पाण्याच्या पुनर्वापरासाठी सुमारे 306 किलोमीटर प्राथमिक जाळे तयार करणे
# वाकड, पिंपळे सौदागर, कासारवाडी, एमआयडीसी,  चिखली य चऱ्होली अशा पाच ठिकाणी एक ते पाच दशलक्ष लिटर क्षमतेचे जलकुंभ निर्मिती करणे
# प्रकल्पाचा मुळ खर्च 532 कोटी व जीएसटीसह 654   कोटी खर्च अपेक्षित आहे

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.