Maval : लोकसभेची ही निवडणूक भारताचे अस्तित्व टिकवणारी – देवेंद्र साटम

एमपीसी न्यूज- देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला जिंकवणे ही आपली जबाबदारी आहे. विकासाचा झंझावात असाच कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर येणं आवश्यक आहे. नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यास देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी मोठी ताकद मिळणार असून येणारी लोकसभेची निवडणूक भारताचे अस्तित्व टिकवून ठेवणारी आहे. असे मत माजी आमदार देवेंद्र साटम यांनी व्यक्त केले.

नेरुळ येथे नेरळ शहर, ग्रामीण आणि जिल्हा परिषद विभागाचे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. प्रचार कार्यालय उदघाटन प्रसंगी देवेंद्र साटम बोलत होते. यावेळी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा प्रमुख वसंत भोईर, सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत खालापूर विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, सरपंच जान्हवी साळुंखे, माजी सैनिक सावळाराम जाधव, राजेश जाधव, मीना टिल्लू, सुजाता मनवे, गजुभाई वाघेश्वर, पंढरीनाथ राऊत, संतोष भोईर, केशव तरे, सुरेश टोलरे, अंकुश दाभने, सुरेश गोमारे, प्रवीण गायकवाड, सुजाता मनवे, अब्दुल्ला नजे, समीर नजे, मोहम्मद नजे आदी उपस्थित होते.

महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. नांगुर्ले, मोहिली, तमनाथ, मोहोली, नेवाळी, आवळस, बीड बुद्रुक, चोची, कोंदिवडे, खांडपे, पोसरी, कशेळे, खांडस, वारे, कळंब, साळोख, माले, आसे, आर्ढे, पाषाणे, शेलु आदी गावांना भेटी दिल्या. शिवसेना युवासेना कळंब जिल्हा परिषद विभाग संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले.

देवेंद्र साटम म्हणाले, “बोलणारा खासदार, सर्वांना सोबत घेऊन जाणारा खासदार, देशहितासाठी झटणारा खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांची ख्याती आहे. बारणे यांनी रस्त्यांचे जाळे, रेल्वेचा विस्तार, पनवेल विमानतळाचे काम प्रगतीपथावर सुरू केले, जलवाहतूक सुरू केली. नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये भारताची प्रतिमा उंचावली. बँकांपासून वंचित असलेल्या नागरीकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणले. अनेक योजनांचा मोबदला बँक खात्यात येऊ लागला. ही क्रांती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली. ज्याला भारताविषयी आस्था आहे, तो प्रत्येकजण ‘मैं भी चौकीदार’ म्हणू लागला आहे. नागरिकांच्या विश्वासावर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे.”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “कर्जत खालापूर हा शिवसेनेचा गड आहे. महायुतीची या भागात मोठी ताकद आहे. लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेत काम करत असताना कर्जत खालापूर या भागाला सर्वाधिक निधी दिला. माथेरान रेल्वे बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला होता. त्यासाठी पाठपुरावा करून बंद पडणारी रेल्वे सुरू केली. त्यात सुधारणा केली. रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण करून रेल्वे स्थानकांचा विकास केला. तुंगी सारख्या आदिवासी पाड्यावर वीज पोहोचवली. नरेंद्र मोदी सरकारने मागील पाच वर्षाची तुलना मागील पन्नास वर्षांशी होईल. भारताची जनता पुढेही नरेंद्र मोदी यांनाच देशसेवेची संधी देणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.