Maval: वादळामुळे नुकसान झालेल्या मावळातील फुल शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार – श्रीरंग बारणे

मावळातील नुकसानग्रस्त भागाची खासदार बारणे यांनी केली पहाणी. Maval: Compensation will be given to the farmers who cultivate flowers in Maval damaged by the storm - Shrirang Barne

एमपीसी न्यूज –  मावळमध्ये मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी  पॉलिहाऊस उभारले आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले  आहे. तरुण शेतकरी नव्याने फुलांच्या व्यावसायात मोठ्या संख्येने उतरले आहेत. या नुकसानीमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे. पॉलिहाऊसचा इन्शुरन्स देखील काढला जात नाही. नुकसानग्रस्त फुल शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने सर्वाधिक मदत मिळवून देण्याची ग्वाही  शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. फुलांची शेती करणाऱ्यांना मोठी मदतीची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्दशनास आणून दिले आहे. त्यांना मोठी मदत मिळावी अशी विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार बारणे  यांनी आज (शुक्रवारी) मावळ परिसरात जाऊन ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, सहाय्यक कृषी अधिकारी रामचंद्र ढगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे, अंकुश देशमुख आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, निसर्ग चक्री वादळामुळे मावळ तालुक्यातील कार्ल्या जवळील पिंपोवळी या गावातील सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले असून मोठे नुकसान झाले आहे. आंदरमावळमध्ये  मोठ्या प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. यासाठी शेतकऱ्यांनी या भागात अनेक पॉलिहाऊस उभारले आहेत. पॉलिहाऊसचे मोठे नुकसान झाले  आहे. पिचडवाडी आणि पवळेवाडीत मोठे नुकसान झाले आहे. प्लॅस्टिक पूर्णपणे सपाट झाले आहे. मावळ तालुक्यात तरुण शेतकरी फुलांच्या व्यावसायात मोठ्या संख्येने उतरला आहे. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांना आधार देण्याची गरज आहे.   पॉलिहाऊसचा इन्शुरन्स देखील काढला जात नाही. त्यांना सरकारच्या वतीने सर्वाधिक मदत मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

रायगड, अलिबागला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. त्या दौ-यातही मी सहभागी झालो होतो. मावळात फुलांची शेती करणा-यांना मोठी मदतीची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिले आहे. त्यांना मोठी मदत मिळावी अशी विनंती केली आहे.  आदिवासी पाडा, डोंगरद-यात राहणा-या नागरिकांचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे. घरांचे पत्रे, कौल उडाली आहेत. त्याचे पंचनामे केले जात आहे. त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल. याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे.

मावळातील शेतक-यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी उद्या लोकप्रतिनीधींची बैठक बोलविली आहे. शेतक-यांचे झालेले नुकसान त्यांच्याही निर्दशनास आणून देणार आहे. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे. घरावरील पत्रे उडाले आहेत. नर्सरीचे नुकसान झाले आहे. त्यांना मोठी भरपाई मिळावी याची मागणी त्यांच्याकडे करणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.