Maval : आम्हाला घाटावरचे प्रश्न माहीत आहेत तसे घाटाखालचेही प्रश्न माहीत आहेत- अजित पवार

मोहोपाडा रसायनीत पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ सभा

एमपीसी न्यूज- आम्हाला घाटावरचे प्रश्न माहीत आहेत तर घाटाखालचेही प्रश्न माहीत आहेत. येथील लोकसंख्या पाहता दांडफाटा रेल्वे थांबा, कामगारवर्गांचे प्रश्न, शेतक-यांचा मोबदला आदी प्रलंबित आहेत. हे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत. असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ रसायनीतील मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात आयोजित केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुरेश लाड, आमदार अवधुत तटकरे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राजिप अध्यक्षा आदीती तटकरे, इंटक राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, कामगारनेते भाई जगताप, रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, रायगड जिल्हा परिषद आरोग्य सभापती नरेश पाटील, पंचायत समिती सभापती कांचन पारंगे, सरपंच ताई पवार, मनसेचे उपजिल्हाप्रमुख दीपक कांबली, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे, विभागप्रमुख अनिल पिंगळे, आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, नोटबंदी फसली, काळा पैसा बाहेर काढून गरीब जनतेच्या खात्यात जमा करणार असे सांगण्यात आले. परंतु नोटाबंदीमुळे 55 लाख लोकांच्या नोक-या गेल्या तर 45 वर्षांत न वाढलेली बेकारी वाढली. समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला घाटावरचे प्रश्न माहीत आहेत तर घाटाखालचेही प्रश्न माहीत आहेत. रसायनी परिसरातील प्रलंबित समस्या मांडत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घाटाखालच्या समस्याही ब-याच असल्याचे सांगितले. येथील लोकसंख्या पाहता दांडफाटा रेल्वे थांबा, कामगारवर्गांचे प्रश्न, शेतक-यांचा मोबदला आदी प्रलंबित आहेत. मागील पाच वर्षात देशाचा विकास न करता स्वतःचा विकास केलेला आहे असा आरोप अजित पवार यांनी केला.

शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेसला मत द्या, हे सांगायला मी पहिल्यांदाच रसायनीत आलो आहे. देशाची लोकशाही वाचविण्यासाठी महाआघाडीत शेकाप सामील आहे. देशातील लोकशाही अबाधित राहिली पाहिजे. बारणेंनी गेल्या पाच वर्षांत या परीसरात कोणती विकासकामे केली ती दाखवावी असा टोला पाटील यांनी लगावला.

देशात उत्तम कार्य करायचे असेल तर पार्थ मतदान करुन विजयी करा, असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.