Maval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

तात्काळ पंचनामे करून बाधित सर्व शेतक-यांना मदत करण्याच्या खासदार बारणे यांच्या प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.

खासदार श्रीरंग बारणे यांनी अंदर मावळातील टाकवे, माऊ, वडेश्वर या गावतील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी हरीश्चंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी ढगे, महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, रोहिदास अस्वले, यशवंत तुरडे, शांतराम लष्करे आणि परिसरातील शेतकरी आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. मावळ तालुक्यात यावर्षी 12 हजार हेक्टर जमिनीवर भात शेतीची लागवड झाली आहे. अतिवृष्टीमुळे जवळपास अडीच हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. शेतीवर अवलंबून आसणा-या शेतक-यांचे यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मावळ परिसरात प्रामुख्याने भातशेती केली जाते. मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे. या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांनी पाहणी केली. ज्या भागातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्या भागात प्रशासनाने जाऊन तात्काळ पंचनामे करावेत. बाधित झालेल्या सर्व शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी. कोणताही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचना खासदार बारणे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

तहसीलदार मधुसूदन बर्गे म्हणाले, “अतिवृष्टीमुळे बाधित शेतक-यांना शासनाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य केले जाईल. शासन निर्णयानुसार आर्थिक मदत केली जाईल. संपूर्ण तालुक्यामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम चार ते पाच दिवसांपासून सुरू झाले आहे. हे काम पुढील दोन दिवसात पूर्ण करून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना अहवाल सादर केला जाणार आहे. सर्व बाधित शेतक-यांना मदत केली जाईल, अशी खात्री देखील त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.