Maval : जयहिंद इंडस्ट्रीज, संकल्प फाऊंडेशनच्या वतीने 250 कुटुंबांना अन्नधान्याची मदत
एमपीसी न्यूज – जयहिंद इंडस्ट्रीज आणि संकल्प फाऊंडेशनचे संस्थापक, उर्से गावचे उपसरपंच प्रदीप मारुती धामणकर यांच्या वतीने मावळ तालुक्यातील उर्से आणि परंदवडी भागातील 250 कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
तांदूळ, आटा, साखर, चहा पावडर, तेल, मसूर डाळ, तुर डाळ, हरभरा डाळ, हळद, मीठ, लाल तिखट, साबण या वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. यावेळी वसंत पापळ, शिरीष राऊत, सुब्रोत जेना, राजू पठाण, दत्तात्रय लकडे, दिलीप बालदोटा, राजू पठाण, निलेश धामणकर आदी उपस्थित होते.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील याचा प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात आदिवासी समाज आणि ज्यांचे हातावर पोट आहे, अशा नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी जयहिंद इंडस्ट्रीज आणि संकल्प फाउंडेशनच्या वतीने उपसरपंच प्रदीप धामणकर यांनी अन्नधान्य वाटप केले.