Maval News : रिंगरोडसाठी भंडारा डोंगराला बोगदा पाडू नका, रेखांकनात बदल करा’

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे; रिंगरोड बाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसोबत बैठक

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रस्तावित केलेला 110 मीटर रुंद रिंगरोड मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून किंवा बोगदा पाडून जात असल्याचे नकाशामध्ये दर्शविण्यात आले आहे. डोंगराला बोगदा करण्यास वारक-यांचा, संस्थानचा तीव्र विरोध आहे. वारक-यांच्या भावना लक्षात घेता भंडारा डोंगराला भेदून जाणा-या रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची आग्रही मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी राज्य सरकारकडे केली.

दरम्यान, श्रद्धास्थानाच्या बाबतीत वारक-यांची कोणत्याही प्रकारची भावना न दुखावता मार्ग काढण्याचे आश्वासन नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

श्री विठ्ठल रुखमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट आणि नागरिकांनी रिंगरोडच्या रेखांकनात बदल करण्याची मागणी खासदार बारणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार खासदार बारणे यांच्या पुढाकारातून मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आज (गुरुवारी) मुंबईत बैठक झाली. बैठकीला खासदार बारणे, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, श्री क्षेत्र भंडारा डोंगर हे जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे अत्यंत पवित्र असे ठिकाण आहे. भंडारा डोंगरास महाराष्ट्र सरकारने तीर्थ क्षेत्र घोषित करून तेथे विविध विकास कामे केली आहेत.

डोंगरावर ट्रस्टतर्फे भव्य असे श्री संत तुकाराम महाराजांचे जागतिक किर्तीचे मंदिर बांधकाम सुरू आहे. याच डोंगरावर संत तुकाराम महाराजांना साक्षात्कार होऊन संत तुकाराम गाथा या अभंग ग्रंथाची निर्मिती झाली आहे. तसेच जिजामातेला साक्षात पांडुरंगाने दर्शन दिले.

या पवित्र ठिकाणी शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट झाली. हे स्थान श्री क्षेत्र देहू या संस्थानपासून जवळ आहे. त्यामुळे तेथे महाराष्ट्रातून व देश-विदेशातून पर्यटक दर्शनासाठी येतात. श्री क्षेत्र भंडार डोंगराला बोगदा करण्यास वारकऱ्यांचा व संस्थानचा विरोध आहे.

… तर बंद जलवाहिनीसारखीच रिंगरोडची परिस्थिती होईल !

प्रस्तावित रिंगरोड श्री क्षेत्र भंडारा डोंगराला भेदून जात आहे. त्यासाठी डोंगराला बोगदा पाडावा लागत असल्याचे नकाशात दिसून येत आहे. त्याला वारकरी, सांप्रादाय क्षेत्रातील नागरिकांचा मोठा विरोध आहे. डोंगराच्या लगत रस्ता तयार करावा. त्यातून रिंगरोडसाठी मार्ग काढावा. पोलीस बळाच्याद्वारे काम केले तर पवना बंद जलवाहिनीसारखीच रिंगरोडची परिस्थिती होईल, असे खासदार बारणे यांनी निर्दशनास आणून दिले.

त्यावर मंत्री शिंदे म्हणाले, ”यातून योग्य मार्ग काढला जाईल. श्रद्धास्थानाच्या बाबतीत वारक-यांची कोणत्याही प्रकारची भावना दुखावली जाणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.