Maval News : संत तुकाराम कारखान्याचा उच्चांकी व विक्रमी गाळप, 6 लाख 33 हजार 200 पोती उत्पादन

एमपीसी न्यूज – श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा (सन 2020 – 21) 23 वा गळीत हंगाम विक्रमी गाळपाने नुकताच संपन्न झाला. यावर्षी 175 दिवस गाळप हंगाम चालला या कालावधीत 5 लाख 61 हजार 300 मेट्रीक टन ऊसाचे उच्चांकी गाळप करून 6 लाख 33 हजार 200 पोती साखर उत्पादन झाले. सरासरी साखर उतारा 11.30 टक्के इतका झाला. अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा तथा नाना नवले व उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी दिली.

मावळ, मुळशी, खेड, हवेली आणि शिरूर तालुक्यातील 461 गावे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात. यावर्षीच्या गाळपाचे नियोजन अध्यक्ष, उपाध्यक्षसह विद्यमान संचालक मंडळाने केले होते. तर कार्यकारी संचालक साहेबराव पठारे व कृषी विभाग प्रमुख उमाकांत जाधव आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना कालखंड असूनही उच्चांकी गाळप पूर्ण केले.

कारखाना प्रशासनाने यावर्षी ऊस तोडणीसाठी 105 टोळ्या, 229 टायर गाड्या आणि 11 ऊसतोडणी यंत्रे वापरण्यात आली. तर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील 300 गावामधून ऊसतोडणी करून तो गाळपासाठी आणण्यात आला. यावर्षी शेतकऱ्यांनी एकूण 7 हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवडीची नोंदणी केली होती.

ऊस गाळपाबरोबरच कारखाना सहवीज निर्मिती प्रकल्प चालवित असून यावर्षी 5 कोटी 50 लाख 12 हजार 700 युनिट वीज निर्मिती करून 3 कोटी 79 लाख 95 हजार युनिट वीज कारखान्याने महावितरण वीज कंपनीस विकली आहे.

यावर्षी कारखान्याने FRP 2660 रूपये निश्चित केलेली असून टनावर पहिला हप्ता 2130 रूपये दिलेला आहे. तर वेळोवेळी ऊसाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवित आहे. यावर्षीपासून इथेनाॅल प्रकल्प कारखाना सुरू करणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.