Maval News: समाज, प्रशासन, राजकीय यंत्रणेच्या गर्तेत अडकलेल्या पत्रकारांचीच उपेक्षा- दिलीप डोळस
शासनाचे कोणतेही कार्यालय असो अडवणूक झाली की पत्रकार आठवतो. पण जेव्हा पत्रकारावर अडचण येथे तेव्हा मात्र सर्वांचे हात आखूड होतात, पत्रकारांचे दोष काढतात.
एमपीसी न्यूज – नेहमी समाज, प्रशासन आणि राजकीय यंत्रणांच्या गर्तेत अडकून त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांची कोरोनाच्या काळात मोठी उपेक्षा होत आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याच्यावर प्रशासनाकडून उपचार देखील करणे होत नाही. ही मोठी शोकांतिका असल्याची भावना तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी व्यक्त केली.
डोळस पुढे बोलताना म्हणाले की, पोलीस गुन्हा दाखल करत नाही, पत्रकार आठवतो, डॉक्टर उपचार करत नाही पत्रकार आठवतो, 100 रुपयांचे धान्य, कपडे जरी वाटले तरी सामाजिक कार्यकर्त्यांना, राजकारण्यांना प्रसिद्धीच्या हव्यासासाठी पत्रकार आठवतो. माझी प्रत्येक बातमी लागली पाहिजे असे म्हणणा-या काही राजकारणी, काही लोकप्रतिनिधी यांनाही पत्रकार आठवतो. शासनाचे कोणतेही कार्यालय असो अडवणूक झाली की पत्रकार आठवतो. पण जेव्हा पत्रकारावर अडचण येथे तेव्हा मात्र सर्वांचे हात आखूड होतात, पत्रकारांचे दोष काढतात.
समाजाच्या विविध घटकासाठी जर पत्रकार लढतो. दुसऱ्यासाठी लढणाऱ्या पत्रकाराला जर व्यवस्थेच्या निष्क्रियेतेचा बळी ठरावे लागत असेल. तर तिथल्या प्रशासकीय यंत्रणेला पत्रकारांसाठी योग्यवेळी बेड उपलब्ध करून देता येत नाही, रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. यासर्व गोष्टींमुळे टीव्ही 9 वृतवाहिनीचे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर हा संघर्षशील योद्धा पत्रकार गेल्याची खंत डोळस यांनी व्यक्त केली.