Maval News: महाभकास आघाडीला आरक्षण टिकवता आले नाही- गणेश भेगडे

दहा टक्के आर्थिक आरक्षण खंडपीठाकडे गेलं पण स्थगिती नाही, तामिळनाडूत आरक्षणाला स्थगिती नाही. मग आपल्या सरकारला हे का नाही जमलं? उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांपैकी कुणी या विषयाकडे लक्ष का दिले नाही?

एमपीसी न्यूज- मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होऊ नये असा निर्णय न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा समाजाच्या आयुष्यातला हा काळा दिवस आहे. महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असे गणेश भेगडे यांनी म्हटले आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारने आरक्षण दिले. आरक्षण काही महिन्यांसाठी टिकलं पण नंतर स्थगिती मिळाली.

आमच्या सरकारमध्ये कायमस्वरूपी मराठा आरक्षण टिकण्यासाठीचे प्रयत्न झाले. आम्ही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले. मात्र महाभकास आघाडीला सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, असं भेगडेनी म्हटले आहे.

खंडपीठाकडे दिलेला विषय पूर्णच होत नाही. त्यामुळे तात्पुरती स्थगिती नाही. आम्ही सरकारला सांगत होतो की, जरा गांभीर्याने या प्रकरणाकडे लक्ष द्या. पण अशोक चव्हाण यांना ते काही जमलं नाही. सरकारने स्थगिती घेऊन स्वतःवर कुऱ्हाड मारून घेतली.

दहा टक्के आर्थिक आरक्षण खंडपीठाकडे गेलं पण स्थगिती नाही, तामिळनाडूत आरक्षणाला स्थगिती नाही. मग आपल्या सरकारला हे का नाही जमलं? उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांपैकी कुणी या विषयाकडे लक्ष का दिले नाही? आम्ही स्वस्थ बसणार नाही. या सरकारला आरक्षण टिकवता आले नाही हे करंटे आहेत, अशी टीका गणेश भेगडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.