Pune : डॉ. लीला गोखले यांच्या ‘माझी गोष्ट’ आत्मकथनाचे प्रकाशन
एमपीसी न्यूज- ‘वैद्यकीय व्यवसाय हा आज व्यवसाय न राहता धंदा बनला आहे, तरीही प्रामाणिक, मार्गदर्शक डॉक्टर या व्यवसायात आहेत, या प्रामाणिक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ. लीला गोखले (रानडे ) यांचे स्थान अतिशय वरचे आहे ‘ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी काढले. पुण्यातील जुन्या पिढीतील शतायुषी स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. लीला गोखले (रानडे )यांच्या ‘ माझी गोष्ट ‘ या आत्मकथनाचे आणि ई -बुकचे प्रकाशन ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी किरण नगरकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
डॉ. गोखले या 101 वर्ष वयाच्या आहेत. मौज प्रकाशन गृह यांच्या वतीने, ज्येष्ठ लेखक किरण नगरकर तसेच ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष काळे यांच्या हस्ते हे आत्मकथन प्रकाशित झाले. यावेळी ‘ मौज ‘ प्रकाशनचे संजय भागवत, श्रीकांत भागवत, मोनिका गजेंद्रगडकर, अतुल गोखले, अनिता बेनिंजर- गोखले, ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे उपस्थित होत्या.
नगरकर म्हणाले ,”एक स्त्री आणि एक डॉक्टर किती मोठे काम करू शकते याचे दर्शन डॉ लीला गोखले यांच्या पुस्तकातून होते. आजच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना हे पुस्तक वस्तुपाठ म्हणून उपयोगी ठरेल. सुविधा असलेल्या प्रतिकूल काळात गोखले यांच्या पिढीने अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय केला. या प्रामाणिक, अपवादात्मक वैद्यकीय व्यावसायिकात डॉ. लीला गोखले (रानडे ) यांचे स्थान अतिशय वरचे आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकाचे प्रतिबिंब या आत्मकथनात पडले आहे”
डॉ सुभाष काळे म्हणाले, “आरोग्य या विषयाकडे शासनाचे प्रथमपासून दुर्लक्ष आहे. वाढत्या लोकसंख्येच्या भयानक धोक्याबाबत कोणताही पक्ष बोलत नाही, मतदारही त्यांना याबाबत प्रश्न विचारत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर डॉ लीला गोखले यांनी जुन्या काळात केलेले कुटुंबनियोजनाचे काम आणि स्पष्ट विचार महत्वपूर्ण ठरतात. त्यांच्या मेडिकल रेकॉर्ड ठेवण्याची पद्धती आजच्या काळात पाहायला मिळणे दुरापास्त झाले आहे. कोणाचेही दडपण न मानता, मिळकतीकडे लक्ष न देता रुग्णसेवा केली. प्रसूतीसाठी आलेल्या स्त्री रुग्णांना घरचे जेवण आणि तुपाच्या बरण्या देणाऱ्या डॉ लीला गोखले आज दंतकथाच वाटतील”
मोनिका गजेंद्रगडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. आत्मकथन मौज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे, तर इ -बुक ‘बुकगंगा’ ने प्रकाशित केले आहे . इ -बुक चे प्रकाशनही आजच्या कार्य्रक्रमात झाले. अतुल गोखले यांनी सूत्रसंचालन केले.