Media to report patiently: माध्यमांनी संयम ठेवून वार्तांकन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबई पोलिसांमधील 8 माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांतसिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती.

एमपीसी न्यूज – मागील सुमारे अडीच महिने सर्वांचे लक्ष अभिनेता सुशांतसिंहच्या अचानक झालेल्या मृत्यूकडे वेधलेले आहे. या काळात अनेक गोष्टी घडल्या आहेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआय चौकशी सुरु आहे. दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पण याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलिसांच्या तपासावर कोणत्याही प्रकारे आक्षेप घेण्यात आला नाही. तरीदेखील रोज कोणी ना कोणी टीका करत आहे. म्हणून मुंबई पोलिसांमधील 8 माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांतसिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर गुरुवारी सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने माध्यमांना संयम ठेवण्यास सांगितलं.

आठ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांतसिंह प्रकरणी सुरु असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी न्यायालयात 31 ऑगस्ट रोजी याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर निर्णय देताना सुशांतसिंह प्रकरणी वार्तांकन करताना माध्यमांनी संयम ठेवावा. तसंच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशा प्रकारे वार्तांकन करावं, असं न्यायालयानं सांगितले आहे.

राज्यातील माजी डीजीपी एम. एन. सिंग, पी. एस. पसरिचा, डी. के. सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के. सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के. पी. रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. “या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसंच वार्तांकन हे पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखं बदलू नये,” असं याचिकाकर्त्यांनी नमूद केलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.