Maval News : मावळात जागवल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृती

हुतात्मा क्रांतिकारी नागोजी कातकरी यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – जुलमी इंग्रज राजवटी विरुद्ध 91 वर्षांपूर्वी चिरनेर जंगल सत्याग्रहात मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या आदिम जनजाती – कातकरी समाजातील हुतात्मा क्रांतिकारी नागोजी महादू कातकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त मावळ तालुक्यातील सर्व कातकरी पाड्यांवर त्यांस अभिवादन करून त्यांच्या स्मृती जागविण्यात आल्या.

तत्कालीन जुलमी इंग्रज राजवटीच्या शोषक व अमानवी कायद्यांविरुद्ध पुकारलेल्या सविनय कायदेभंग – जंगल सत्याग्रहात शेकडो वननिवासी जीवाची पर्वा न करता सहभागी झाले. परंतु हा सत्याग्रह चिरडून टाकण्याच्या राक्षसी मनोकामनेतून इंग्रज राजवटीतील पोलीस दलाने नृशंस हत्याकांड केले होते.

आजच्या रायगड जिल्ह्यात असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर येथील अक्काबाईच्या डोंगरावर दि. 26 सप्टेंबर 1930 रोजी तत्कालीन जुलमी इंग्रज राजवटीच्या शोषक व अमानवी कायद्यांविरुद्ध पुकारलेल्या सविनय कायदेभंग – जंगल सत्याग्रहात शेकडो वननिवासी जीवाची पर्वा न करता सहभागी झाले परंतु हा सत्याग्रह चिरडून टाकण्याच्या राक्षसी मनोकामनेतून इंग्रज राजवटीतील पोलीस दलाने नृशंस हत्याकांड केले. त्यात आदिम कातकरी जनजातीतील क्रांतिकारी हुतात्मा नागोजी कातकरी गंभीर जखमी झाले व उपचाराच्या अभावाने त्यांचा मृत्यू झाला.

भारत मातेच्या स्वातंत्र्ययज्ञात आपली प्राणसमिधा या महान क्रांतिकारकाने हसत हसत अर्पण केली.या स्मरणार्थ प्रतिवर्षी दि. 25 सप्टेंबर या दिवशी हुतात्मा क्रांतिकारी नागोजी महादू कातकरी यांचा स्मृतिदिन साजरा केला जातो.

याचाच भाग म्हणून कुणे नामा येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे नियोजन हिंदु समितीकडून करण्यात आले होते. तसेच मावळच्या पवना खोऱ्यातील करूंज गावच्या राऊतवाडीतील आदिम कातकरी पाड्यावर विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमांतर्गत तेथील निवासी तरुणांनी पाड्याची स्वच्छता, सजावट करून हुतात्मा क्रांतिकारी नागोजी महादू कातकरी यांची अभिवादन यात्रा काढण्यात आली, पाठोपाठ पाड्यावर अभिवादन सभा संपन्न झाली त्यात जनजाती समाजातील समाज व लोकप्रतिनिधीं समवेत वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, धर्म जागरण (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ), अखिल भारतिय विद्यार्थी परिषद व अन्य कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

या सभेत कातकरी समाज बांधवांनी संघटित होऊन आपल्या महान पूर्वजांचा आदर्श जोपासत स्वतः व समाज व देशाच्या उत्कर्षाचा संकल्प केला.

याप्रसंगी वनवासी कल्याण आश्रम, महाराष्ट्र प्रांतचे प्रमुख वक्ते ऋषभ मुथा, पुणे जिल्हा परिषद सदस्य (मुळशी) सागर काटकर, धर्म जागरण पुणेचे अनिल वाघमारे, बजरंग दलचे संतोष भेगडे पाटील, धर्म जागरण – मावळचे अर्जुन शिंदे, सरपंच सदाशिव शेंडगे, शिळीम गांवचे सरपंच दीपक घोगरे, शिवलीचे उपसरपंच अशोक वाघमारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजन संतोष जाधव, स्वप्नील वाघमारे,अशोक जाधव, बबन वाघमारे,रामदास वाघमारे, गणपत वाघमारे,संतोष वाघमारे व अन्य सहकारी संयोजकांनी केले. कार्यक्रमाचा समारोप महाप्रसादाने झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.