Mumabi – मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मनोरंजनसृष्टी घेणार पुन्हा भरारी

एमपीसीन्यूज  : करोनाच्या संकटामुळे सध्या अनेक व्यवसाय बंद झालेले आहेत. त्याचे मुख्य कारण सोशल डिस्टन्सिंग हे आहे. चित्रपटसृष्टीलादेखील याचा मोठा फटका बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनेक कलाकार, निर्माते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कृती आराखडा देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सध्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण अर्ध्यावरच थांबले आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. या नुकसानातून बाहेर येण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मदत करावी, अशी विनंती अनेक निर्माते आणि कलाकारांनी केली होती.

सर्व स्तरातील कलाकार,  निर्माते,  बॅकस्टेज कर्मचारी, सहाय्यक कलाकार यामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यांना या आश्वासनामुळे दिलासा मिळाला आहे.

यासाठी काहीतरी ठोस नियमावली ठेवून मार्ग काढणे शक्य आहे. शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री सचिवालयातील अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. संजय मुखर्जी सहभागी झाले होते.

या कॉन्फरन्सचे सूत्रसंचालन सुबोध भावे आणि आदेश बांदेकर यांनी केले होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निर्माते प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे, अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे यांनी बैठकीत आपल्या समस्या मांडल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.