Mumabi : जाणून घ्या अभिषेक, ऐश्वर्याच्या लग्नाला राणी मुखर्जी का नव्हती…

एमपीसी न्यूज : ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांच्या लग्नात राणी मुखर्जी दिसली नाही. राणीचं अभिषेकसोबतचं नातं आणि ऐश्वर्यासोबतचं शीतयुद्ध या कारणांमुळे तिला लग्नाचं निमंत्रणच दिलं गेलं नव्हतं, असं म्हटलं जातं. ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या जुन्या मुलाखतीत राणीने तिला लग्नाला का बोलावलं नाही, यावर प्रतिक्रिया दिली होती.

राणी म्हणाली, ‘मला लग्नाला का बोलावलं नाही याचं उत्तर अभिषेकच देऊ शकेल. खरंतर एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्याच्या लग्नाला बोलावत नसेल तर तुमचं त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय स्थान आहे हे लगेच कळतं. तुम्ही मैत्रीचा विचार करत बसता पण त्या व्यक्तीने तुम्हाला केवळ सहकलाकार म्हणून समजलेलं असतं’.

‘मला त्याने काही फरक पडत नाही. त्या घटनेमुळे हे स्पष्ट झालं की आम्ही फक्त सहकलाकार होतो, मित्र नव्हतो आणि लग्नाला बोलावणं ही त्या व्यक्तीची वैयक्तिक निवड आहे. जेव्हा माझं लग्न होईल, तेव्हा मीसुद्धा निवडक लोकांनाच आमंत्रित करेन.’

विश्वसुंदरी ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन यांनी २० एप्रिल २००७ रोजी लग्नगाठ बांधली. धूमधडाक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. पण अभिषेकची अनेक चित्रपटांमधली सहकलाकार अभिनेत्री राणी मुखर्जी या लग्नात कुठेच दिसली नव्हती. त्यावेळी यावर बरीच चर्चासुद्धा झाली होती.

असं म्हटलं गेलं की ‘चलते चलते’ या चित्रपटासाठी सुरुवातीला ऐश्वर्याची निवड झाली होती. तिने काही काळ शूटिंगसुद्धा केलं होतं. मात्र काही कारणास्तव ऐश्वर्या या चित्रपटातून बाहेर गेली आणि राणीला हा चित्रपट मिळाला. तेव्हापासून या दोघींमध्ये शीतयुद्ध असल्याचं म्हटलं जातं. त्यातच राणीने बिग बींच्या सोबतही चित्रपटात काम केले होते. अभिषेक आणि राणीच्या लग्नाच्या वावड्या देखील काही काळ उडत होत्या.

या मुलाखतीत राणी ऐश्वर्याबद्दल पुढे म्हणाली, ‘आम्ही एकमेकींशी चांगलेच वागतो. भविष्यात जर आमची भेट झाली तर मी तिला शुभेच्छा नक्की देईन. ती खूप दमदार अभिनेत्री आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.