Mumbai : राज्यात 26 मृत्यू, मृतांमध्ये पुण्याचे 10 रुग्ण; एका दिवसात 1,008 नवीन रुग्ण
आतापर्यंत 485 बळी, 1,879 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11,506 वर
एमपीसी न्यूज : राज्यात दिवसभरात 26 कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 485 बळी गेले आहेत. तर तब्बल 1008 रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11,506 वर पोहोचली आहे. तर 106 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंत एकूण 1879 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
आज मृत्यू झालेल्या 26 पैकी पुणे येथील सर्वाधिक 10, मुंबईचे 5 , जळगाव जिल्ह्यातील 3, पुणे जिल्हा, सिंधुदुर्ग, भिवंडी, नांदेड, ठाणे, औरंगाबाद आणि परभणी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच उत्तरप्रदेशातील एका नागरिकाचा मुंबईत मृत्यू झाला. या 26 मृतांमध्ये 18 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.
या पैकी 14 रुग्ण 60 वर्षांपुढील होते. तर अन्य 11 जण 40 ते 59 वर्ष वयोगटातील, तर एकजण 40 वर्षांखालील आहे. 26 मृतांपैकी 15 जणांना 58 टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार असल्याचे आढळून आले. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 485 बळी गेले आहेत.
आज राज्यभरात एकूण 1,53,125 नमुन्यांपैकी 1,40,587 रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. तर 11506 नमुने पॉझिटिव्ह आहे. सध्या राज्यात 1,36,926 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 9160 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर आजपर्यंत एकूण 1879 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. याशिवाय राज्यात 1,63,026 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 11,677 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.