Mumbai :दिवसभरात नवीन 120 रुग्ण, राज्यात कोरोनाबाधिताची संख्या 868 वर, मृतांचा आकडा 52!
दिवसभरात सात मृतांची नोंद, राज्यात एकूण 66 रुग्ण कोरोनामुक्त
एमपीसी न्यूज – राज्यात आज (सोमवारी) 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 868 झाली आहे. आज राज्यात सात करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 52 पर्यंत जाऊन पोहचला आहे. आतापर्यंत 6े6 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात आज झालेल्या मृत्यूपैकी चार जण मुंबईतील, प्रत्येकी एक जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.
1) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एक 41 वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचा आजारही होता शिवाय तो अपस्माराचा रुग्ण होता.
2) बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मुंबई येथील एका 62 वर्षीय पुरुषाचा चार एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता. त्याला उच्च रक्तदाब , डाव्या अंगाचा पॅरालिसिस हे आजारही होते .
3) मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उच्च रक्तदाब असणा-या 80 वर्षीय पुरुषाचा काल मृत्यू झाला.
4) नवी मुंबई येथील 72 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह आणि हृदयरोग हे आजारही होते.
5) मुंबईच्या नायर रुग्णालयात नालासोपारा येथील एका 9 महिन्याच्या गरोदर मातेचा (वय 30 वर्षे) मृत्यू 4 एप्रिलला संध्याकाळी झाला.
6) मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात 4 एप्रिल रोजी संध्याकाळी एका 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. फेब्रुवारीच्या दुस-या आठवडयात त्यांनी राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली होती. त्यांना दोन वर्षापासून मधुमेहाचा आजार होता.
7) महानगरपालिकेच्या बांद्रा येथील भाभा रुग्णालयात आज सकाळी अंबरनाथ येथील 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या रुग्णाने उत्तर प्रदेश मध्ये प्रवास केला होता आणि त्याला मधुमेहाचाही त्रास होता.
कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 52 झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –
मुंबई – 526 (34)
पुणे शहर व ग्रामीण – 141 (5)
सांगली – 25 (0)
ठाणे मंडलातील इतर मनपा व जिल्हा – 85 (9)
अहमदनगर – 23 (0)
नागपूर – 17 (0)
औरंगाबाद – 10 (1)
लातूर – 8 (0)
बुलडाणा – 5 (1)
सातारा – 5 (0)
यवतमाळ – 4 (0)
उस्मानाबाद – 3 (0)
कोल्हापूर, रत्नागिरी व नाशिक – 2 (0)
जळगाव – 2 (1)
सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशिम, हिंगोली, जालना – 1 (0)
अमरावती – 1 (1)
इतर राज्य – 2 (0)
राज्यात कालपर्यंत झालेल्या 45 मृत्यूंच्या विश्लेषणात पुढील महत्वपूर्ण निष्कर्ष निघतात –
1. एकूण मृत्यूंमध्ये पुरुषांचे प्रमाण 73 % एवढे आहे.
2. 45 वर्षाखालील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून साधारणपणे म्हणजे 60% मृत्यू हे 61 वर्षावरील व्यक्तींचे आहेत.
3. कालपर्यंत झालेल्या एकूण 45 मृत्यूंपैकी साधारणपणे 78 टक्के व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजारही होते.
4. 60 वर्षांवरील आणि मधुमेह – उच्च रक्तदाब असे आजार असणा-या व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता या विश्लेषणातून अधोरेखित झाली आहे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17563 नमुन्यांपैकी 15808 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 868 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 66 करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 32,521 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 3498 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी आठजण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी दोनजण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशीम मधील आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर मनपा क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण मनपा क्षेत्रात 175 सर्वेक्षण
पथके काम करत आहेत तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 214 टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई मनपा क्षेत्रात 178 टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्हयात 71 तर बुलढाणा जिल्ह्यात 147 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण 2,855 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 10 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.