Mumbai: राज्यात 75 हजार रॅपीड टेस्ट करणार, कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार- राजेश टोपे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात करोनाच्या चाचण्या आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार केल्या जात आहेत. केंद्र शासनाने काही निकष लावून राज्याला रॅपिड टेस्ट करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात 75 हजार चाचण्या केल्या जातील तसेच कोरोना उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन सुरू करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती त्यांनी दिली.

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढतेय कारण राज्यात सर्वाधिक चाचण्या केल्या आहेत. त्यासाठी आयसीएमआरच्या सूचना कटाक्षाने पाळल्या जात आहेत. त्याचबरोबर घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण देखील केले जात आहे. त्यासाठी 6,359 पथके कार्यरत आहेत. कुठलीही तडजोड न करता सर्वेक्षण केले जात आहे.

करोना उपचारासाठी असलेल्या रुग्णालयांमध्ये आता ऑक्सिजन स्टेशन करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक खाटेजवळ ऑक्सिजन मास्क आणि त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यकता वाटल्यास त्याचा वापर केला जाईल. ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ नये म्हणून त्याच्या उत्पादकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्याचा करोना रुग्ण दुप्पटीचा वेग हा मंदावत असून सुरुवातीला दोन दिवसांवर असणारा हा दर आता सुमारे सात दिवसांवर गेला आहे. हा दर 20 ते 25 दिवसांवर यावा तेव्हाच काहीशी समाधानाची बाब मानता येईल.

मुंबईत काही ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या गोळ्या देण्याचा निर्णय घेतला असल्याचेही टोपे यांनी नमूद केले. हायड्रोक्सिक्लोरोक्वीनमुळे प्रतिबंधात्मक शक्ती वाढते म्हणून मुंबईत काही भागात ह्या गोळ्या वाटपासाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र ज्यांना हृदयविकार आहे किंवा 60 वर्षांवरील आणि 15 वर्षाखालील व्यक्तींना त्या दिल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही छोट्या चाचण्या देखील करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये एक्स-रे चाचणी तसेच एसपीओटू पल्सऑक्सिमीटर चाचणी करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

ज्या जिल्ह्यात 15 हून अधिक रुग्ण आहेत तो जिल्हा रेड झोन तर 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण वाढला नाही अशा जिल्ह्याला ऑरेंज झोन आणि 28 दिवस नव्याने एकही रुग्ण आढळून आला नाही तो ग्रीन झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.