Mumbai: राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री ठाकरे यांचा मोदी यांना फोन

एमपीसी न्यूज – राज्यात एकीकडे करोनाचे संकट उभे राहिलेले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवरुनही चर्चा रंगली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अद्यापही निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने उलट- सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे यांनी फोनवरुन मोदींशी बोलताना राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केल्याचे समजते. 

दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीसुद्धा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांना दिलेले पत्राचा उल्लेख करत, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी असा महाराष्ट्रातील भाजपचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप केला आहे.

 

कोरोनाच्या संकट काळात आम्ही सर्व एकजुटीने आपल्या पाठीशी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी मोदींना सांगितलं. पण त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र अस्वस्थ करणारे राजकारण होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. मोदी-ठाकरे यांच्या फोनवरच्या संभाषणानंतर आता आमदारकीबाबत राज्यपालांच्या निर्णयावर काही परिणाम होतो का, या बाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे.

घटनात्मक तरतुदीनुसार मुख्यमंत्रीपदाची शपथ व्यक्ती विधानसभा किंवा विधानपरिषदेची सदस्य नसेल तर त्यांना सहा महिन्यांत दोन्हीपैकी एका सभागृहाचा सदस्य बनणे आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत 28 मे रोजी ही सहा महिन्यांची मुदत संपतेय. एप्रिलमध्ये नियोजित असलेल्या नऊ जागांच्या विधानपरिषद निवडणुका कोरोना संकटकाळात स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे दुसरा कुठला पर्याय दिसत नसल्याने महाविकास आघाडी सरकारने ठाकरे यांची राज्यपालांकडून नामनिर्देशित सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नेमणूक व्हावी, अशी शिफासर करणारा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत केलेला आहे.

खरंतर या ठरावालाही आता 20 दिवस होत आले, तरी अद्याप राज्यपालांकडून कुठला निर्णय झालेला नाही. कालच याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनावर भेट घेण्याआधी भाजपचेही नेते तिथे पोहचले होते. राज्यात माध्यमांना लक्ष्य करण्याचा जो प्रयत्न आहे त्याबाबत ही चर्चा झाल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. पण या भेटीत उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबतही खलबते झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. त्यात आता मोदी- ठाकरे यांच्यात झालेल्या फोनवरुन चर्चेचा शिवसेना नेत्यांनी दिलेला तपशील खरा असेल तर याबाबत केंद्रीय पातळीवरुन आता पुढचे काय संकेत मिळतात, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.