Mumbai: आर्थिक अपयश लपविण्यासाठी धार्मिक भांडण लावण्याचा भाजपचा प्रयत्न -प्रकाश आंबेडकर

एमपीसी न्यूज – देशाचे आर्थिक अपयश लपविण्यासाठी धार्मिक भांडण लावण्याचा प्रयत्न भाजप सरकार करत आहे, असा सणसणीत आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच संसदेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला देखील त्यांनी कडाडून विरोध केला आहे.

बेरोजगारी ही सध्या देशापुढील सगळ्यात मोठी समस्या आहे. मात्र, यातून मार्ग काढण्यात सरकार अपयशी ठरत आहे. तसेच आर्थिक प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी सरकार धार्मिक वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर केला आहे.

तसेच संविधानाचा ढाचा उद्ध्वस्त करण्याचं काम भाजप आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ करत आहे. संविधानाने दिलेल्या समतेच्या तत्वाची पायमल्ली करुन नागरिकांमध्ये धार्मिक भेदभाव करणाऱ्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला माझा विरोध आहे.

दरम्यान, कायद्यात नैसर्गिक नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. त्यामध्ये कुठेही धर्माचा उल्लेख नव्हता. पण, आजच्या विधेयकात धर्माचा उल्लेख केला जात आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.