Mumbai : लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार पासचे वाटप; तर, 96 हजार गुन्हे दाखल -अनिल देशमुख

एमपीसी न्यूज – राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी तीन लाख 10 हजार 694 पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले आहेत. तसेच राज्यात लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यावर 96 हजार गुन्ह्यांची नोंद झाली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या (दि. 22 मार्च ते 6 मे) कालावधीत कलम 188 नुसार 96 हजार 231 गुन्ह्यांची नोंफ झाली आहे. त्यात 18 हजार 885 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी 3 कोटी 56 लाख 81 हजार 994 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 189 घटना घडल्या आहेत. त्यात 663 व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू असल्याचेही गृहमंत्री म्हणाले.

पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या 100 नंबर वर प्रचंड भडिमार झाला असून त्यावर 85 हजार 309 फोन आले आहेत. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली आहे.

तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का मारला आहे, अशा 649 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले आहे. राज्यात एकूण दोन लाख 24 हजार 219 व्यक्ती क्वारंटाईन आहेत. अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे. लॉकडाऊन मध्ये थोडीशी शिथिलता मिळाली असली म्हणजे लॉकडाऊन संपले असे नाही. उलट या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

अवैध वाहतुकीवर चाप
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार 281 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. 53 हजार 330 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलीस कोरोना कक्ष
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील तीन, पुणे एक, सोलापूर शहर एक अशा पाच पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला. 43 पोलीस अधिकारी व 444 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

रिलिफ कँम्प
राज्यात एकूण चार हजार 738 रिलिफ कँम्प आहेत. त्या ठिकाणी जवळपास चार लाख 35 हजार 30 लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.