Mumbai : राज्यात एकूण पाच ‘करोना’बाधितांचा मृत्यू!; आठ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले; राज्यात एकूण रुग्ण संख्या 130

एमपीसी न्यूज – वाशी येथील एक महिला व कस्तुरबा रुग्णालयातील एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याने राज्यातील कोरोनाबळींची संख्या आज दोनने वाढली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित मृतांची एकूण संख्या पाच झाली आहे. 

गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक 65 वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांकडून संदर्भित होऊन जनरल हॉस्पिटल वाशी येथे अत्यंत गंभीर अवस्थेत दिनांक 24 मार्च रोजी दुपारी भरती झाली होती. तिचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन काल स्पष्ट झाले.

तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे. तर, राज्यात आज आणखी तीन कोविड 19 रुग्णांची नोंद झाल्यामुळे राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 125 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

राज्यात आज एकूण 269 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3243 जणांना भरती करण्यात आले आहे.

आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2750 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 125 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.