Mumbai : बकरी ईदचा खर्च टाळून कामगार नेते इरफान सय्यद यांनी पूरग्रस्तांना केली एक लाखाची मदत

इरफान सय्यद यांच्या सामाजिक दातृत्वाने शहरातील मुस्लिम बांधवापुढे एक नवा आदर्श

एमपीसी न्यूज- घरांची पडझड झाल्यामुळे, पुरातून साहित्य वाहून गेल्यामुळे तसेच अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारे कोल्हापूर, सांगली परिसरातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. येथील महापूराने आतापर्यंत हजारो लोकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. त्यामुळे आता सर्वच स्तरातून या पूर बाधित नागरिकांना मदतीचा हात दिला जात आहे. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी देखील बकरी ईदचा खर्च टाळून पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची मदत दिली आहे. इरफान सय्यद यांनी नुकतीच शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

मुस्लिम बांधवांचा ‘बकरी ईद’ हा सण देशभरात मोठ्या धूमधड्याक्यात साजरा करण्यात येतो. या सणाची मुस्लिम बांधव आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु, इरफान सय्यद यांनी ‘बकरी ईद’ या सणासाठी घरगुती येणारा खर्च पूरग्रस्त बांधवाच्या मदतीसाठी दिला आहे. इरफान सय्यद यांनी नुकतीच शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या पूरग्रस्तांसाठी १ लाख रुपयांचा धनादेश आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. पक्षामार्फत ही आर्थिक मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहचवली जाणार आहे. इरफानभाई सय्यद यांच्या सामाजिक दातृत्वाने पिंपरी चिंचवड शहरातील मुस्लिम बांधवापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

याप्रसंगी शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी इरफान सय्यद यांच्या या कृतीचे कौतुक केले. राज्यावर अशा प्रकारचे अस्मानी संकट आले असतानाही शिवसेनेचे मावळे प्रजेसाठी एका पायावर उभे राहून मदतीसाठी तत्पर असतात. शिवसेनेला अशा मावळ्यांचीच गरज आहे. त्यासाठी त्यांना पक्षाकडून हवी ती ताकद पुरविली जाईल. तसेच इरफान सय्यद यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.

याबाबत बोलताना शिवसेना व कामगार नेते इरफानसय्यद म्हणाले, “गेले काही दिवस महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात पूर परिस्थिती खूपच भयंकर होती. यामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे. महाराष्ट्र मजदूर संघटना व कामगारांच्या वतीनेही पूरग्रस्तांना याआधीच जीवनावश्यक वस्तू व आरोग्य पथकही रवाना केले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील गणपती मंडळांनीही आपल्या सजावटीवर होणाऱ्या खर्चात कपात करुन ती रक्कम पूरग्रस्तांपर्यंत पोहचविली पाहिजे. शिवसेनेच्यावतीनंही मदत केली जात आहे. या मदतीच्या आधारे पूरग्रस्त नागिरकांना आपला संसार पुन्हा थाटण्यासाठी नक्कीच आधार मिळेल”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.